वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली. एकूण 102 जणांना पद्मश्री, 16 जणांना पद्मभूषण आणि 7 जणांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासह 7 नामांकित व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान आणि माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासह 10 दिग्गजांना पद्मभूषण देण्यात येणार आहे.
देशातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय सेवा केलेल्या 119 मान्यवरांचा पद्म पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार दिवंगत गायक एस. पी. बालसुब्रमण्यम, डॉ. बेले मोनप्पा हेगडे, नरिंदरसिंग कपानी, मौलाना वहीदउद्दीन खान, विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील बी. बी. लाल, सुदर्शन साहू यांनाही पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. देशातील हा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान समजला जातो. सरकारने 7 जणांना पद्मविभूषण जाहीर केला आहे. यात पार्श्वगायक एस. पी बालसुब्रमण्यम यांना मरणोत्तर पुरस्कार मिळाला.
पासवान, केशुभाईंना पद्मभूषण
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये 10 जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत. कृष्णन नायर संतकुमारी चित्र (कला), तरुण गोगोई (जनसेवा), चंद्रशेखर कंबार (साहित्य व शिक्षण), माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान, गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल, काळबे सादिक, रजनीकांत देवीदास श्रॉफ, तारलोचन सिंग यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
सिंधुताई, गिरीश प्रभुणे पद्मश्री
महाराष्ट्रातील एकूण सहा जणांचा पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. सिंधुताई सपकाळ आणि गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार दिला गेला आहे. नामदेव कांबळे यांना साहित्याबद्दल, कला क्षेत्रातील परशुराम गंगावणे यांना पद्म पुरस्कार जाहीर झाले.
हुतात्मा संतोष बाबू यांना मरणोत्तर महावीरचक्र
हुतात्मा कर्नल संतोष बाबू यांना महावीरचक्र जाहीर झाला आहे. लडाखमधील गलवान खोऱयात झालेल्या संघर्षात ते हुतात्मा झाले होते. संतोष बाबू यांच्याबरोबरच चिनी सैन्याविरुद्ध लढलेल्या अनेक सैनिकांना शौर्य पुरस्काराने गौरवित केले जाणार आहे. दरवषी 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला विविध शौर्य पुरस्कार जाहीर केले जातात. परमवीर चक्रानंतर सैन्यात महावीर चक्र हा सर्वात मोठा सन्मान आहे. यावेळी कर्नल संतोष बाबू यांना मरणोत्तर हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. मागील वषी 15-16 जूनच्या रात्री गलवान व्हॅलीत चकमक झाली होती.