पगारासाठी दिवाळीत शासनमान्यता न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
कणकवली:
जिल्हय़ात आरोग्य विभागात रत्नागिरी जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामार्फत 52 सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. मात्र, त्यांचे गेले दहा महिने वेतन थकित आहे. सुरक्षारक्षकांच्या पगारासाठी निधी उपलब्ध असून तो शासन मान्यता नसल्याच्या कारणास्तव खर्ची होऊ शकत नसल्याचे सांगितले जाते. होळी गेली, गणपती उत्सव गेला, दसरा गेला, आता दिवाळी आली. पण, प्रामाणिकपणे काम करणाऱया सुरक्षारक्षक व त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. दिवाळीपर्यंत जर शासनमान्यता मिळाली नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य सुरक्षा एकता समितीचे अध्यक्ष विजय गुरव यांनी दिला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, शासन मान्यतेचा प्रस्ताव तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी 27 जुलैला शासनाकडे पाठविला होता. त्यानंतर नूतन शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनीही 8 ऑक्टोबरला नवीन सुधारित प्रस्ताव शासनाला पाठविला. एकिकडे शासकीय मान्यतेबाबात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांचा पाठपुरावा सुरू असताना शासनाचा सुरक्षा रक्षकांबाबत उदासीन कारभार आहे. सुरक्षा समितीने आरोग्य संचालकांशी संपर्क साधला असता, उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.
याबाबत जिल्हय़ातील लोकप्रतिनिधींशी संपर्क साधला असून तेही न्याय मिळवून देण्याच्या मन:स्थितीत नाहीत. पालकमंत्र्यांशीही अनेकदा चर्चा झाली आहे. समितीने मुख्यमंत्री कार्यालयाशीही पत्रव्यवहार केला. पण, ‘दखल घेत आहोत’ असे सांगण्याखेरीज अन्य कोणतेही आश्वासन मिळालेले नाही. वास्तविक, सुरक्षारक्षकांनी कोरोना काळात जीवाची पर्वा न करता, प्रत्यक्ष कोरोना रुग्णांच्या संपर्कात येऊन काम केले आहे. महाराष्ट्र शासनाने किंवा कुठल्याच राजकीय पुढाऱयांनी त्यांची दखल घेतली नाही. या कोरोना योद्धय़ांना शासन आरोग्य विभागात सामावून घेईल, अशी अपेक्षा होती. पण तसे आजघडीस तरी दिसत नाही, असेही गुरव यांनी म्हटले आहे.
जिल्हा शल्य चिकित्सकांशी चर्चा
महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक समितीतर्फे नुकतीच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांची भेट घेण्यात आली. यावेळी आरोग्य विभागातील सुरक्षारक्षकांच्या वेतनाचा प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती डॉ. चव्हाण यांना करण्यात आली. यावेळी समिती अध्यक्ष विजय गुरव, सदस्य तुकाराम सावंत, भूषण परब, अमित सावंत, नवीन नादिवडेकर, नारायण गुडेकर, जयेश लोट आदी उपस्थित होते.