संयुक्त राष्टसंघ / वृत्तसंस्था
पर्यावरण संरक्षणाचा संबंध देशांच्या सुरक्षेशी जोडण्याची तरतूद असणाऱया प्रस्तावावर भारताने संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत विरोधी मतदान केले आहे. पर्यावरणाचा संबंध सुरक्षेशी जोडल्यास पर्यावरण संरक्षणासंबंधीचे अभियान कमजोर होईल, अशी चिंता व्यक्त करत भारताने प्रस्तावाविरोधात मत दिले.
सध्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद नायजेर या देशाकडे डिसेंबर महिन्यासाठी आहे. या देशाच्या प्रतिनिधीने अध्यक्ष या नात्याने पर्यावरण, दहशतवाद आणि सुरक्षा या संबंधांमध्ये एक चर्चा 9 डिसेंबरला आयोजित केली होती. ‘मेटेनन्स ऑफ इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटी ः सिक्युरिटी इन द कॉन्टेस्ट ऑफ टेरोरिझम अँड क्लायमेट चेंज’ असे या विषयाचे नाव होते. दहशतवाद आणि सुरक्षेला असणारा धोका यांचा संबंध पर्यावरणाशी कसा जोडता येईल, यावर मतप्रदर्शन करणे हा या चर्चेचा मुख्य हेतू होता, असे स्पष्ट करण्यात आले होते.
भारताचा आक्षेप
या विषयावरचा प्रस्ताव संमत झाल्यास पर्यावरण संरक्षण हा विषय सुरक्षा परिषदेच्या कार्यकक्षेत जाईल. त्यामुळे केवळ काही मोठे देश, जे सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य आहेत, त्यांच्याच हातात इतर सर्व देशांच्या पर्यावरणासंबंधीचे निर्णय घेण्याचा अधिकार जाईल. हे पाऊल पर्यावरण संरक्षण या संकल्पनेची हानी करणारे ठरेल, असा आक्षेप भारताने नोंदविला होता. नंतर मतदानही विरोधात केले.
प्रगत देशांचे उत्तरदायित्व
प्रदूषित वायू वातावरणात सोडण्याचे प्रमाण कमी करण्याचे आश्वासन अनेक प्रगत देशांनी दिले होते. तथापि, त्या आश्वासनांची पूर्ती आजवर झालेली नाही. अशा स्थितीत केवळ छोटय़ा आणि आर्थिकदृष्टय़ा अप्रगत देशांवर पर्यावरणाच्या संरक्षणाची सक्ती करणे हे अयोग्य आणि अन्याय्य आहे. हा असमतोल दूर होणे आवश्यक आहे, असेही स्पष्ट मत भारताने या चर्चेच्या वेळी व्यक्त केले होते.