रौद्र अशा पडत्या पावसात सुर्डी येथील युवकांचे 15 तास चालू होते काम
प्रतिनिधी / बार्शी
यंदाच्या हंगामातील परतीच्या पावसाने बार्शी तालुक्यामध्ये रुद्र असे स्वरूप धारण केलेले होते. 14 ऑक्टोबर दिवसभर झालेल्या अतिवृष्टीमुळे शहर आणि तालुक्यांमध्ये पाण्याने प्रचंड हाहाकार माजवलेला होता. बार्शी च्या ग्रामीण भागात तर परिस्थिती खूप बिकट निर्माण झालेली होती. जवळपास पाच तलाव पाण्याची क्षमता वाढल्याने फुटलेले होते. हे तलाव फुटल्याने अनेक गावे पाण्याखाली गेली होती. अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.
मात्र या अतिवृष्टी मध्येही बार्शी तालुक्यातील सुर्डी या गावात असणारे प्रचंड मोठे असणारे असे तेरा पाझर तलाव मात्र सुरक्षित राहिलेले पाहायला मिळाले. तसे पाहता इतर तालुक्यातील मंडल प्रमाणेच याही सुर्डी गावांमध्ये तेवढाच पाऊस झालेला पाहायला मिळाला परंतु या गावातील व परिसरातील तेरा तलाव मात्र सुरक्षित राहिलेले होते. याला कारण एकच या गावातील युवकांनी पडत्या पावसात हे तलाव सुरक्षित ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न हे होय. याच गावातील प्राध्यापक मधुकर डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली या युवकांनी हे तलाव सुरक्षित ठेवण्यासाठी अति तात्काळ अशी उपाय योजना मोहीम राबवली.
तसं बार्शी तालुक्यातील सुर्डी हे गाव महाराष्ट्राच्या नकाशावर गाजलेला गाव आहे. पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप या स्पर्धेमध्ये 2019 साली प्रथम क्रमांक या गावाने पटकावला होता. पाणी फाउंडेशन आणि लोक सहभाग यातून हे गाव गेली दोन वर्षापासून पाणीदार झालेले आहे. मृदा संधारण बाबत या गावाने विशेष कार्य केलेले आहे. या गावात बावीस हजार घनमीटर एवढे श्रमदान झाले असून यंत्राने दोन लाख 54 हजार घनमीटर एवढे कार्य पाणी अडवण्यासाठी आणि जिरवण्यासाठी झालेले आहे. 14 ऑक्टोबरच्या पहाटेपासून सुरू झालेल्या अतिवृष्टीने मात्र तालुक्याप्रमाणेच याही गावात हाहाकार माजलेला होता.
लोकवर्गणीतून आणि लोकसहभागातून या गावात जवळपास 13 पाजर तलाव कार्यरत आहेत. हे तलाव आकाराने मोठे असल्याने यात पाणी साठवण क्षमता ही जास्त आहे. सुर्डी या गावाच्या शेजारील भागात उंचावर असणारे तलाव भरल्याने सर्व तलावांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त झाले होते. पाणी जास्त झाल्याने आणि सांडव्याचे मार्गही पूर्ण क्षमतेने वाहत असल्याने तलावाच्या भरावा वरून पाणी ओवरफ्लो होण्यास सुरुवात झाली होती. ही बाब येथील युवकांच्या लक्षात येताच त्यांनी प्राध्यापक मधुकर डोईफोडे यांना ही बाब अवगत केली. तात्काळ या युवकांनी आणि प्राध्यापक डोईफोडे यांनी निर्णय घेतला आता शासनाच्या यंत्रणेची वाट न पाहता आपणच आपले गाव सुरक्षित केले पाहिजे आणि ही टीम लागली कामाला.
समोरील माणूसही दिसत नव्हता अशा रौद्र अशा पावसामध्ये जवळपास गावात गुडघाभर असलेल्या पाण्यामधून वाट काढत याच गावातील युवक सर्व पाझर तलावाच्या जवळ पोहोचले. गावातीलच एक जेसीबी आणि मिळेल ते साहित्य खोऱ्या , पाट्या घेऊन या सर्व युवकांनी या तलावाचे सांडवे गाठले. पाणी जास्त झाल्याने भरावामार्गे पाणी ओवरफ्लो होत आहे. हे पाहताच या युवकांनी सांडव्याचे मार्ग थोडे मोठे केले व सांडपाण्याच्या मार्गात येणारे सर्व अडथळे, झाडे झुडपे व माती बाजूला सारून सांडव्यातून पाणी बाहेर पडण्यास वाट करून दिली.
पाणी सांडव्यावरून बाहेर निघाल्याने सर्व तलावाच्या भरावास कोणताही धोका पोहोचला नाही आणि सर्व तलाव सुरक्षित राहिले . बार्शी तालुक्यातील पाच तलाव फुटल्याने हाहाकार माजला होता त्यातच हे तेरा तलाव सुर्डी येथील या युवकांनी सुरक्षित राखले यामुळे बरीच जीवित व आर्थिक हानी थांबलेली आहे. आणि मोठा अनर्थ ही टळला आहे. शासन पातळीवर ही घटना कळताच गटविकास अधिकारी शेखर सावंत , लघुपाटबंधारे विभागाचे अभियंता मच्छिंद्र सोनवणे व इतर यंत्रणांनी या सर्व तेरा तलावाला भेट देऊन येथील युवकांनी केलेले काम पाहिले आणि प्राध्यापक डोईफोडे यांच्यासह या युवकांची पाठ थोपटली.
या युवकांनी सुरक्षित ठेवले तलाव
संतोष लोहार आनंद पुणे बाबासाहेब डोईफोडे अजित शेळके विलास शेळके केशव शेळके आप्पा शेळके रघुनाथ शेळके आनंद कापसे हिरोजी शेळके बाजीराव शेळके बालाजी शेळके राहुल शेळके महादेव शेळके यांनी प्राध्यापक मधुकर डोईफोडे यांच्यासह सर्व तेरा पाझर तलाव सुरक्षित राखले