‘एम्स’ डॉक्टरांचा खुलासा : शवविच्छेदन अहवालाचा अभ्यास
प्रतिनिधी/ मुंबई
गेल्या तीन महिन्यांपासून अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यासाठी सीबीआय कसोशीने चौकशी करत असतानाच, सुशांतची हत्या नसून ती आत्महत्या असल्याचा खुलासा एम्सच्या पथकाने केला आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत असलेल्या सीबीआयने स्पष्टीकरण देण्यास नकार दिला आहे.
सुशांत प्रकरणात दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) डॉक्टरांच्या टीमने सीबीआयकडे आपला अहवाल सुपूर्द केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एम्सच्या डॉक्टरांनी सुशांतची हत्या झाली असावी, या थेअरीला नकार दिला आहे. सुशांतचे कुटुंबीय आणि त्याच्या वकिलांनी सुशांतला आधी विष देऊन मारले आणि नंतर गळफास देण्यात आला, असा आरोप केला होता. मात्र एम्सच्या डॉक्टरांनी या प्रकरणाचा पूर्ण तपास केल्यानंतर सुशांतच्या गळ्यावर असलेल्या खुणा, शवविच्छेदनात स्पष्ट केलेली मृत्यूची वेळ आणि इतर तथ्यांनुसार सुशांतची हत्या झाली असावी असे म्हणता येणार नाही, असे एम्स डॉक्टरांच्या टीमने स्पष्ट केले.
14 जून रोजी सुशांतने मुंबईतील वांद्रे परिसरातील आपल्या राहत्या घरात गळफास घेतला होता. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी केला होता. मुंबई पोलिसांनी सुशांतने आत्महत्या केली, असे स्पष्ट केले होते. परंतु, सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली, असा आरोप कुटुंबीयांनी केला होता. त्यानंतर याप्रकरणी सीबीआय तपासाची मागणी केली असता, अखेर हा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचल्यानंतर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाच्या तपासाला सीबीआयला परवानगी दिली.
महाराष्ट्रविरोधी षड्यंत्र उघड
अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आत्महत्याच केल्याचे एम्सच्या अहवालातून स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचणाऱया सूत्रधाराचा शोध लावण्यासाठी आता आघाडी सरकारने एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
महाराष्ट्राची माफी मागा
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ‘एम्स’चा अहवाल समोर आला असून, त्यामध्ये सुशांतची हत्या झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणावरून ज्या लोकांनी आमच्या महाराष्ट्राची आणि पोलिसांची बदनामी केली, त्या सर्व लोकांनी आता तोंड न लपवता जाहीरपणे महाराष्ट्राची आणि पोलिसांची बदनामी केल्याबद्दल माफी मागावी, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादीचे युवा नेते कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटद्वारे भाजपला उद्देशून केली आहे. हे ट्विट करताना त्यांनी ‘सत्यमेव जयते’ हा हॅशटॅगसुद्धा वापरला आहे.