मुंबई \ ऑनलाईन टीम
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरण सीबीआय चौकशीला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. सीबीआयने अद्याप यावर काही भाष्य केलेलं नाही. यावरुन महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सुशांतसिंग राजपूत प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणांचा मोदी सरकारने त्यांच्या राजकीय अजेंड्यासाठी वापर केला असल्याचा आरोप सचिन सावंत यांनी ट्वीटच्या माध्यमातून केला आहे.
सीबीआयने बिहार पोलिसांकडून सुशांतसिंग राजपूतच्या दुर्दैवी मृत्यूची चौकशी हाती घेतल्यापासून आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. सर्वोच्च न्यायालयानेही मुंबई पोलिसांच्या एकूण तपासाबद्दल समाधान व्यक्त केलं होतं. परंतु गुप्तेश्वर पांडेंचा वापर भाजपच्या राजकीय अजेंड्यासाठी केला जात होता. जो मुंबई पोलिसांची प्रतिमा खराब करण्यासाठी आणि महाविकास अघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी होता. भाजपने उघडपणे खूनाचा, बलात्काराचा अँगल देत बिहार निवडणुकीत सुशांतच्या मृत्यूचा वापर जेवढ्या खालच्या पातळीवर जाऊन करता येईल तेवढा केला, अशी टीका सचिन सावंत यांनी ट्वीटरवरून केली आहे.
महाविकास आघाडी सरकारवर ठरवून हल्ला करण्यात आला. काही वृत्त वाहिन्या देखील यात सहभागी होत्या. भाजप नेते महाराष्ट्राची बदनामी करत राहिले. सीबीआय आणि इतर एजन्सींनी बनावट माहिती लीक केली. भाजप आयटी सेलने हजारो बनावट ट्विटर, एफबी अकाउंट तयार केल्याचे देखीस संचिन सावंत यांनी म्हटले आहे. एम्स पॅनेलने हत्येला नकार देऊन आता ३०० पेक्षा जास्त दिवस झाले आहेत. सीबीआय मुद्दाम मौन पाळत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणांनी केलेल्या तपासाची ही चेष्टा मोदी सरकारकडून त्यांच्या राजकीय अजेंड्यासाठी कशी वापरली जात आहे याचे उत्तम उदाहरण असल्याचे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.