वार्ताहर/ माशेल
प्रियोळ मतदार संघाचा विकास हेच आपले ध्येय असून विकासकामाबाबत कधीच दुजाभाव करीत नाही. कदंब बसस्थानकाच्या सुसज्ज जागेत भाजी व्यवसायिकांने कुठलेही तंटे न करता, परिसरात स्वच्छता राखत आपला व्यवसाय व्यवस्थित करावा, काही अडचणी असल्यास पंचायत मंडळ किंवा आपल्याला प्रत्यक्ष भेटून समस्या सोडवाव्या असे आवाहन प्रियोळचे आमदार तथा कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी केले.
माशेल येथील खुल्या जागेवरील भाजी मार्केटचे स्थलांतर कदंब बसस्थानकावरील जागेत काल रविवारी झालेल्य़ा उद्घाटन सोहळयात ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. मंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते श्रीफळ व फित कापून उद्घाटन करण्यात आले. शुभारंभी एकूण 30 भाजी विक्रेत्यांचे नवीन जागेत स्थालांतर करण्यात आले आहे.
सोहळय़ाला उद्योजक राजेंद्र नारकर, सरपंच उन्नती नाईक, उपसरपंच जयेश नाईक, पंच संकेत आमोणकर, पाईक गावडे, मनमीता गावडे, सुशांत नाईक, सचिव सुशांत नाईक उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री गावडे म्हणाले तिवरे वरगांव पंचायतीच्या नागरिकांना आश्वासन दिले होते की पंचायत कार्यालय कदंब बसस्थानक इमारतीत स्थलांतर करावे, त्यासाठी भाडेही आकारले जाणार नाही. तरीही आजपर्यंत पंचायत कार्यालय स्थलांतरीत करण्यात आलेले नाही. याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला. जनता आपल्या प्रभागातील पंचसदस्यांना पंचायतीच्या विकासासाठी निवडत असतात. तेव्हा पंचायत मंडळाने एकसंघ राहून कार्य केल्यास गावाचा विकास संभव आहे. प्रियोळ मतदारसंघात एकूण सात पंचायती असून आमदार तथा मंत्री या नात्याने मी सर्व पंचायतीत अनेक विकासकामे पुर्ण केलेली आहेत. तसेच कोरोना महामारीमुळे अर्धवट राहिलेली कामे पुर्णत्वाकडे नेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
उद्योजक राजेंद्र नारकर यांची जमीन गेली सात वर्षे भाजी मार्केटसाठी वापरण्यात आली. याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. या सात वर्षात त्याच्याकडून पुर्ण सहकार्य मिळाल्याचे फळविक्रेत्यांचाही व्यवसाय सुरळीत झाल्याचे ते म्हणाले.
उद्योजक राजेंद्र नारकर यांनी यापुढेही आपले मतदारसंघाच्या विकासासाठी असेच सहकार्य करणार असल्याचे सांगितले. यावेळी 30 भाजी विक्रेत्यांनी नवीन जागेवर आपल्या व्यवसायाला सुरूवात केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रेमानंद शिरोडकर यांनी केले. उपसरपंच जयेश नाईक यांनी आभार मानले.