सिंधुदुर्गात झालेल्या प्रचंड उपोषणामुळे पालकमंत्री अवाक : आता दर महिन्याला जनता दरबार ‘हा सूर्य हा जयद्रथ’ ची भूमिका घेणार पालकमंत्री
न्याय देण्यास दिरंगाई करणाऱया अधिकाऱयांवर होणार कारवाई?
प्रतिनिधी / ओरोस:
प्रजासत्ताक दिनी सिंधुदुर्गात झालेल्या उपोषणांमुळे अवाक झालेल्या नूतन पालकमंत्री उदय सामंत यांनी यावर जनता दरबाराचा तोडगा काढला आहे. प्रशासनाकडून न सुटलेल्या प्रश्नांबाबत प्रत्येक महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालय येथे जनता दरबार घेतला जाणार आहे. प्रशासनाकडे अडकलेले प्रश्न सोडवून नागरिकांना जलद न्याय दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
26 जानेवारी रोजी सिंधुदुर्गनगरी येथे जि. प. व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मिळून 21 उपोषणे झाली. पालकमंत्रीही यामुळे अवाक झाले. वारंवार मागणी करून वा लक्षवेध आंदोलने करून बरीच वर्षे प्रश्न प्रलंबित असल्याची बाब आपल्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे हे प्रश्न सोडविण्यासाठी दर महिन्याच्या एका सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत जनता दरबार घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्हाधिकाऱयांबरोबरच जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व अन्य सर्व विभागांचे अधिकारी या जनता दरबाराला उपस्थित राहतील, असे ते म्हणाले.
प्रशासनाकडे बरीच वर्षे अडकून पडलेले प्रश्न पालकमंत्री वा मंत्र्यांकडे गेल्यानंतर सुटू शकतात, यावर जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे समस्या घेऊन मंत्र्यांकडे जाण्याची प्रवृत्ती वाढली आहे. याची दखल घेत प्रशासनाकडून नेमका काय अन्याय झाला आहे तसेच समोरच्याला काय म्हणायचे आहे, हे समोरासमोर जाणून घेऊन अन्यायग्रस्तांना न्याय दिला जाणार आहे. एका जनता दरबारात झालेला प्रश्न पुढील महिन्याच्या जनता दरबारापूर्वी सोडविला जाईल. तोडगा निघालेले प्रश्न एक महिन्यात मार्गी न लावल्यास संबंधित अधिकाऱयांवर कारवाई करणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. रत्नागिरी जिल्हय़ात ही संकल्पना राबविली होती. त्याचा चांगला परिणाम दिसून आला होता. त्यामुळे या जिल्हय़ातही नागरिकांचे प्रश्न जलदगतीने सुटतील व उपोषण वा आंदोलनांचे प्रमाणही कमी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान या दिवशी या वेळेत कोणत्याही लोकप्रतिनिधीला आपण भेटणार नाही. तसेच पक्षासाठीचे कामही होणार नाही. जिल्हाधिकारी वा अन्य अधिकारी ऐकत नाहीत. त्यामुळे न्याय मिळत नाही, अशा नागरिकांसाठी हा जनता दरबार आयोजित केला जाणार आहे, असे पालकमंत्री म्हणाले.