वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सूर्यकुमार यादव हा नवा ‘मिस्टर 360 डिग्री’ फलंदाज म्हणून उदयास आला असून तो अपयशी ठरल्यास भारताला पुरेशा धावा जमविण्यासाठी संघर्ष करावा लागेल, असे मत भारताचे माजी महान फलंदाज व समालोचक सुनील गावसकर यांनी मांडले आहे.
टी-20 क्रिकेटमधील जागतिक क्रमवारीत सूर्यकुमार यादव सध्या अग्रस्थानावर असून आपल्या पहिल्याच टी-20 विश्वचषक स्पर्धेत त्याने ‘तळपदार’ प्रदर्शन केले आहे. सुपर 12 फेरीतील त्याच्या तुफानी फलंदाजीमुळे भारताला उपांत्य फेरीत स्थान मिळविता आले आहे. झिम्बाब्वेविरुद्ध रविवारी झालेल्या शेवटच्या सामन्यात त्याने चौफेर फटकेबाजी करीत केवळ 25 चेंडूत नाबाद 61 धावा झोडपताना त्याने मैदानाच्या प्रत्येक कोपऱयात फटके लगावले. ‘त्याने केलेल्या प्रत्येक डावातील फटकेबाजी 360 अंशातील होती, असे म्हणता येईल. यष्टिरक्षकाच्या डावीकडून मारलेला स्कूपचा षटकार तर पाहण्यासारखा होता तर अखेरच्या षटकात त्याने थोडेसे स्क्वेअरर होत गोलंदाजाने टाकलेल्या अँगलचा लाभ घेत फटकेबाजी केली. तसेच त्याने एक्स्ट्राकव्हरच्या दिशेने अप्रतिम लोफ्टेड ड्राईव्ह फटकावला, त्याच्या भात्यात प्रत्येक फटका उपलब्ध होता. त्याने एकदा शानदार स्ट्रेट ड्राईव्हही फटकावला,’ असे गावसकर यांनी म्हटल्याचे एका साप्ताहिकाने सांगितले.
सूर्याने केलेल्या फलंदाजीमुळेच भारताला या स्पर्धेत ‘रक्षण’ करण्याइतक्या धावा जमविण्यात यश आल्याचे गावसकर यांना वाटते. ‘आपण यशस्वीपणे संरक्षण करू शकू, इतक्या धावा त्याच्यामुळे जमविता आल्या आहेत. एमसीजीवर भारताने सर्वोच्च टी-20 धावसंख्या नोंदवली. त्याची नाबाद 61 धावांची खेळी झाली नसती तर भारताला दीडशे धावांचा पल्लाही गाठता आला नसता,’ असे ते म्हणतात.
राहुलने जबाबदारी घ्यावी
वारंवार अपयशी ठरत असल्याने सलामीवीर केएल राहुलवर बरीच टीका होऊ लागली होती. पण बांगलादेश व झिम्बाब्वेविरुद्ध मागील दोन सामन्यात त्याला फॉर्म गवसला आणि लागोपाठ दोन अर्धशतके नोंदवली. जर सूर्या अपयशी ठरला, तर राहुलने जबाबदारी घेण्याची गरज आहे. आपल्या संघात सध्या सूर्यकुमार व विराट कोहली हे दोनच फलंदाज जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. राहुललाही आता सूर गवसला आहे, पण त्याने अर्धशतकाहून अधिक योगदान देण्याची गरज आहे. सूर्या अपयशी ठरल्यास भारताला 140-150 धावांची मजल मारण्यासाठीही झगडावे लागू शकते. त्यामुळे राहुलने याहून मोठी खेळी करणे गरजेचे आहे,’ असे गावसकर म्हणाले.
रोहित चमकण्याची आशा
कर्णधार रोहित शर्माकडूनही या स्पर्धेत त्याच्या लौकिकाला साजेसा खेळ झालेला नाही. या स्पर्धेत एक अर्धशतक वगळता त्याने अपेक्षित योगदान दिलेले नाही. पाच सामन्यात फक्त 89 धावा जमविल्या आहेत. त्याचे अर्धशतकही नेदरलँड्सविरुद्ध नोंदवलेले आहे. ‘त्याच्याकडून आतापर्यंत अपेक्षित कामगिरी झालेली नाही. मात्र त्याने शेवटच्या दोन सामन्यांसाठी ते राखून ठेवले असेल, अशी आशा करूया. पुढील दोन सामने अत्यंत महत्त्वाचे आहेत. गटसाखळी फेरीत तुम्हाला अपयशी ठरल्यानंतर दुसरा सामना खेळण्याची संधी मिळते. त्यामुळे धावांसाठी जास्त प्रयत्न करण्याच्या नादात फलंदाज आपली विकेट गमवितात. पण आता बाद फेरीचा सामना असून अशा सामन्यात प्रयोग करणे परवडणारे नसते. त्यात तुम्हाला सर्वोत्तम कामगिरीच करावी लागते. या दोन सामन्यात रोहित अपेक्षित प्रदर्शन करेल, अशी आशा करूयात,’ असे गावसकर पुढे म्हणाले.
रोहत शर्माला या स्पर्धेत भारताला चांगली सुरुवात करून देता आलेली नाही. पुल हा त्याचा ट्रेडमार्क शॉट. पण त्याच फटक्यावर तो बाद होताना दिसत आहे. ‘पहिल्या सहा षटकातील पॉवरप्लेमध्ये तो फक्त मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतो. एकेरी दुहेरी धावांवर भर देताना तो दिसत नाही. तो पुल चांगल्या प्रकारे करतो. पण ऑस्ट्रेलियन सीमारेषांवर हा फटका त्याचासाठी अडचणीचा ठरत आला आहे. दोन वर्षापूर्वीही असेच पहावयास मिळाले होते. त्यावेळी कसोटीमध्ये 40-50 धावा जमविल्यानंतर दोनदा तो पुल करताना बाद झाला होता. तीच समस्या त्याला आताही भेडसावत आहे. टी-20 मध्ये पहिल्या 6 षटकांत सर्कलबाहेर फक्त एक खेळाडू असतो, याचे भान ठेवत त्याने पुल शॉट खेळायला हवा. कारण त्याच्यासाठी हा अधिक धावा मिळवून देणारा फटका आहे,’ अशी सूचनाही गावसकर यांनी केली.