पहिले गोमंतकीय कादंबरीकार पुन्हा प्रकाशात : सव्वाशे वर्षे जुन्या व दुर्मिळ पुस्तकाचे पुर्नमुद्रण
प्रतिनिधी / फोंडा
पहिले गोमंतकीय मराठी कादंबरीकार सूर्याजी सदाशिव महात्मे यांनी सन् 1886 साली लिहिलेली ‘वेषधारी पंजाबी’ ही रहस्यमय कादंबरी तब्बल सव्वाशे वर्षांनंतर पुन्हा वाचकांच्या भेटीला आली आहे. पीईएस महाविद्यालयाच्या माजी प्राध्यापिका व मराठी विभाग प्रमुख डॉ. विद्या प्रभूदेसाई यांनी या दुर्मिळ कादंबरीचे पुर्नमुद्रण व संपादन केले असून गोवा मराठी अकादमीतर्फे हल्लीच ती प्रकाशित झाली आहे.
‘वेषधारी पंजाबी’ ही एकूण मराठी साहित्यातील पहिली परिपूर्ण अशी रहस्यमय प्रदान कादंबरी मानली जाते. तिचा विषय तत्कालीन सामाजिक वास्तवतेशी निगडीत आहे. महात्मे यांच्या या कादंबरीतून रहस्यपट उलगढताना गुढता, प्रेम आदी विषय येतात. डॉ. विद्या प्रभूदेसाई यांनी पीएचडीच्या अभ्यासासाठी ‘गोमंतकीय मराठी कादंबरी : आरंभ ते 1990’ हा विषय निवडला होता. त्यासाठी 1998 साली त्यांनी मुंबई मराठी गंथ संग्रहालयात गोमंतकीय साहित्यिकांच्या पुस्तकांचा शोध घेताना त्यांच्या हाती ही दुर्मिळ कादंबरी लागली.
मुंबईच्या ग्रंथालयात सापडली दुर्मिळ प्रत
गोव्यातील कोणत्याच वाचनालयात या कादंबरीची प्रत उपलब्ध नसल्याचे जाणवल्याने त्यांच्यातील कुतूहल जागृत झाले. अत्यंत जीर्ण अवस्थेत असलेल्या या पुस्तकाची छायाप्रत ग्रंथालयाकडून मोठय़ा प्रयासाने त्यांनी मिळविली. मात्र पीएचडीचे काम व काही कौटुंबीक कारणांमुळे मनात इच्छा असूनही 20 वर्षे या कादंबरीचे पुर्नमुद्रण होऊ शकले नाही. अलिकडेच त्यांनी गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत व परेश प्रभू यांच्याकडे हा विषय मांडला व त्यांनी तो उचलून धरला. त्यामुळे गोव्यातील आद्य मराठी लेखकाची ही कादंबरी पुनर्मुद्रित होऊन नव्याने वाचकांसमोर आली.
तंतूवाद्य व इतर विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन
महात्मे कुटुंब हे मूळ बार्देश तालुक्यातील कोलवाळ गावचे. सूर्याजी महात्मे यांनी 1857 च्या सुमारास नोकरी धंद्यानिमित्त मुंबईला स्थलांतर केले. मुंबईत आल्यानंतर त्यांनी त्यावेळच्या विविधज्ञानविस्तार, मराठी ज्ञानप्रसारक आदी नियतकालिकातून लेखनाला सुरुवात केली. सन 1870 मध्ये त्यांनी स्वत:चे ‘आनंद लहरी’ हे नियतकालिक सुरु केले. याच काळात त्यांनी विविध विषयांवर ग्रंथही लिहिले. त्यांनी ‘सतार’ या तंतूवाद्यावर अभ्यासपूर्ण लिहिलेल्या पुस्तकात या वाद्यासंबंधी विविध अंगानी व सखोलपणे विश्लेषण केले आहे. सन 1886 ते 1899 या काळात ‘विक्रमचरित्र’ तसेच दोन भागात संपादित केलेले ‘यथार्थ दीपिका’ व ‘वामनी ग्रंथ’ या मासिकाचे 24 अंक त्यांनी प्रकाशित केले. 1886 मध्ये त्यांनी लिहिलेली ‘वेषधारी पंजाबी’ ही एकूण मराठी साहित्यातील पहिली रहस्यमय कादंबरी ठरते. दिवंगत मुलाच्या नावाने सुरु केलेल्या ‘बाळाजी आणि कंपनी’ या प्रकाशन संस्थेतून प्रकाशित झालेल्या या कादंबरीचे त्याकाळी वाचकांकडून उत्स्फूर्त स्वागत झाले. कादंबरीच्या खरेदीसाठी मुंबई व गोव्यातील सातशे वाचकांनी पुस्तक खरेदीसाठी आगाऊ नोंदणी केल्याचा संदर्भही सापडतो.
टाईम्स ऑफ इंडियाकडून कादंबरीचे मूल्यमापन
13 डिसेंबर 1899 मध्ये सूर्याजी महात्मे यांचे मुंबईत निधन झाले. त्यावेळी टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रातून त्यांच्यावर लिहिलेल्या मृत्यूलेखात ‘वेषधारी पंजाबी’ या कादंबरीचे योग्य असे मूल्यमापन करण्यात आले होते. अशा प्रकारचे वास्तववादी लेखन करून मराठी साहित्यात मोलाचे योगदान दिल्याचा उल्लेख करण्यात आला होता. विविधविस्तार, केसरी, मनोरंजन अशा नियतकालिकातूनही असे अभिप्राय आले होते. त्यातून महात्मे आणि त्यांच्या या कादंबरीचे स्थान निश्चित होते.
गोव्यातील पात्रे व गावांचा कथानकात वापर
‘वेषधारी पंजाबी’ या कादंबरीचे पूर्ण कथानक मुंबईत घडत असले तरी काही पात्रे गोंमतकीय आहेत. त्यांच्या जीवनातील संघर्षाच्या माध्यमातून गोमंतकातील एका समाज गटाचा प्रश्न या कादंबरीतून मांडला आहे. गोव्यातील अनेक संदर्भही त्यात येतात. काही पात्रे म्हापसा शहराशी संबंधित आहेत. त्या काळातील गोवा ते मुंबई हा बोटीतून प्रवास करताना विविध गावांचे वर्णनही वाचायला मिळते. कादंबरीचे लेखन चित्रदर्शी शैलीत केल्यामुळे प्रत्येक दृष्य वाचकांच्या डोळय़ासमोर घडत असल्याचे जाणवते. 1886 साली ही कादंबरी लिहिली गेल्याने तत्कालीन मराठी भाषेचे नमुने, लेखनाची शैली व लेखनाच्या स्वरुपावरही त्याकाळचे प्रतिबिंब पडलेले आहे. सामाजिक प्रश्न मांडणारे कथानक, पात्र योजना, उत्कंठावर्धक वातावरण निर्मिती व सरळ निवेदनाबरोबरच जीवंत संवाद यामुळे ही कादंबरी परिपूर्ण व वाचनीय ठरली असे डॉ. प्रभूदेसाई सांगतात. विशेष म्हणजे अशा रहस्यमय कादंबऱयामध्ये प्रणय व श्रृगांरिक प्रसंग लिहिताना बऱयाच लेखकांकडून उथळ भाषा व उत्थान वर्णने आढळतात. महात्मे यांच्या या कादंबरीत प्रणय आहे, पण तो निखळ व हे प्रसंग लिहिताना संयमपूर्ण भाषा वापरली आहे.
पुर्नमुद्रित कादंबरीचे अनेक वाचकांकडून स्वागत
कादंबरीची मूळ प्रत जीर्ण झाल्याने व बाईंडिगच्या जागी बऱयाचठिकाणी शब्द व वाक्य रचना कळत नसल्याने त्यांचे अर्थ लावून संपादन करावे लागले. हे करताना मूळ कथानक व तत्कालीन भाषेत कुठलाच बदल न करण्याची दक्षता डॉ. प्रभूदेसाई यांनी घेतली आहे. फेसबुकच्या माध्यमातून अनेक वाचकांनी या पुर्नमुद्रित कादंबरीचे स्वागत केल्याचे त्यांनी सांगितले.
मराठी साहित्यात 1857 मध्ये बाबा पद्मंजी यांनी लिहिलेली ‘यमुना पर्यटन’ ही पहिली कादंबरी मानली जाते. काही समिक्षकांच्या मते ती कादंबरी नसून कादंबरीसदृष्य लेखन आहे. सन 1885 नंतर ह. ना. आपटे यांनी मराठी साहित्यात कादंबरी हा प्रकार खऱया अर्थाने रुजवली. या पार्श्वभूमीवर 1886 साली प्रकाशित झालेली गोमंतकीय लेखक सूर्याजी महात्मे यांची ‘वेषधारी पंजाबी’ ही मराठी साहित्यातील पहिली रहस्यप्रदान कादंबरी ठरावी. कादंबरीच्या आरंभ काळात अशा प्रकारची आशय आणि रचनात्मकदृष्टय़ा वेगळी कादंबरी लिहून सूर्याजी महात्मे यांनी मराठी साहित्यात आपले खास स्थान निर्माण केले आहे.