इंग्लंडविरुद्ध चौथी टी-20 : सूर्यकुमार यादवची 31 चेंडूत 57 धावांची आतषबाजी, जोफ्रा आर्चरचे 33 धावात 4 बळी निष्फळ, शार्दुलचे 2 बळी ठरले निर्णायक
वृत्तसंस्था / अहमदाबाद
टॉस हरल्यानंतर मॅच जिंकता येत नाही, ही मालिकेतील परंपरा खंडित करत भारताने येथील चौथ्या टी-20 लढतीत इंग्लंडला धूळ चारली आणि 5 सामन्यांच्या या मालिकेत 2-2 अशी महत्त्वपूर्ण बरोबरीही साधली. भारताने सुर्यकुमार यादवच्या 31 चेंडूतील 57 धावांमुळे 20 षटकात 8 बाद 185 धावा जमवल्या तर प्रत्युत्तरात इंग्लंडला अंतिम क्षणी विजयापासून दूर रहावे लागले.
विजयासाठी 186 धावांचे आव्हान असताना इंग्लंडने आक्रमक सुरुवात केली होती. मात्र, शार्दुल ठाकुरने स्टोक्स व मॉर्गन यांना सलग दोन चेंडूंवर बाद केल्यानंतर त्यांच्या आव्हानातील जणू जान निघून गेली.
भारतयी संघातर्फे, तिसऱया स्थानी बढतीवर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादवने अवघ्या 31 चेंडूत 57 धावांची आतषबाजी केल्यानंतर व त्याला रिषभ पंत (23 चेंडूत 30), श्रेयस अय्यर (18 चेंडूत 37) यांची साथ लाभल्यानंतर भारताने येथे 8 बाद 185 धावांची मजल मारली होती. भारताची या मालिकेतील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. इंग्लिश संघातर्फे जोफ्रा आर्चरने 4 षटकांचा कोटा पूर्ण करताना 33 धावात 4 बळी घेतले.
इंग्लिश कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकल्यानंतर अपेक्षेप्रमाणे क्षेत्ररक्षण स्वीकारले. रोहित शर्मा व केएल राहुल हे भारताचे दोन्ही सलामीवीर या लढतीत सपशेल अपयशी ठरले. रोहितला 12 चेंडूत 12 तर केएल राहुलला 17 चेंडूत 14 धावांवर परतावे लागले. विराटऐवजी तिसऱया स्थानी बढतीवर आलेल्या सूर्यकुमार यादवचे इरादे मात्र बुलंद होते. त्याने पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचत आपल्या आगमनाची खणखणीत वर्दी दिली व नंतरही धडाकेबाज फलंदाजीचा सपाटा सुरु केला.
सूर्याने येथे 31 चेंडूत 6 चौकार व 3 उत्तुंग षटकारांची आतषबाजी केली. चौथ्या स्थानी फलंदाजीला उतरलेल्या विराट कोहलीचे स्वस्तात बाद होणे मात्र धक्कादायक ठरले. फिरकीपटू रशीदच्या गोलंदाजीवर पुढे सरसावून उत्तुंग फटका लगावण्याचा त्याचा प्रयत्न सपशेल फसला आणि यष्टीरक्षक बटलरने सहजपणे यष्टी उद्ध्वस्त केल्यानंतर विराटला डेसिंगरुमचा रस्ता धरावा लागला. सूर्यकुमार व रिषभ पंत यांनी चौथ्या गडय़ासाठी 40 धावांची तर रिषभ व अय्यर यांनी पाचव्या गडय़ासाठी 34 धावांची भागीदारी साकारली. पुढे, आर्चरनेच या दोघांनाही तंबूचा रस्ता दाखवला होता.
धावफलक
भारत : रोहित शर्मा झे. व गो. आर्चर 12 (12 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), केएल राहुल झे. आर्चर, गो. स्टोक्स 14 (17 चेंडूत 2 चौकार), सूर्यकुमार झे. मलान, गो. करण 57 (31 चेंडूत 6 चौकार, 3 षटकार), विराट यष्टीचीत बटलर, गो. रशीद 1 (5 चेंडू), रिषभ पंत त्रि. गो. आर्चर 30 (23 चेंडूत 4 चौकार), श्रेयस झे. मलान, गो. आर्चर 37 (18 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), पंडय़ा झे. स्टोक्स, गो. वूड 11 (8 चेंडूत 1 षटकार), शार्दुल नाबाद 10 (4 चेंडूत 2 चौकार), वॉशिंग्टन झे. रशीद, गो. आर्चर 4 (2 चेंडूत 1 चौकार), भुवनेश्वर नाबाद 0 (0 चेंडू). अवांतर 9. 20 षटकात 8 बाद 185.
गडी बाद होण्याचा क्रम
1-21 (रोहित, 3.4), 2-63 (केएल राहुल, 7.4), 3-70 (विराट, 8.4), 4-110 (सूर्यकुमार, 13.2), 5-144 (रिषभ, 16.2), 6-170 (पंडय़ा, 18.5), 7-174 (श्रेयस, 19.1), 8-179 (वॉशिंग्टन सुंदर, 19.4).
गोलंदाजी : रशिद 4-1-39-1, आर्चर 4-0-33-4, वूड 4-1-25-1, जॉर्डन 4-0-41-0, बेन स्टोक्स 3-0-26-1, सॅम करण 1-0-16-1.
इंग्लंड : 20 षटकात 8 बाद 177 (स्टोक्स 23 चेंडूत 46, जेसॉन रॉय 40, पंडय़ा, शार्दुल, राहुल चहर प्रत्येकी 2 बळी)
भारताला खराब पंचगिरीचे दुहेरी फटके
या लढतीत भारताला दोनवेळा खराब पंचगिरीचे फटके सोसावे लागले. प्रारंभी, 14 व्या षटकात सॅम करणच्या गोलंदाजीवर डेव्हिड मलानने सूर्यकुमारचा झेल घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी चेंडूचा काही भाग जमिनीला स्पर्शला असल्याचे रिप्लेत स्पष्ट दिसून आले. मात्र, यावेळी टीव्ही पंचांनी रिप्लेत फारसे सुस्पष्ट होत नसल्याचे कारण देत सूर्यकुमारला बाद दिले. नंतर डावातील 19 व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरचा झेल रशीदने टिपला, त्यावेळी त्याच्या उजव्या पायाचा स्पर्श सीमारेषेला झाला असल्याचे रिप्लेत दिसून आले. मात्र, यावेळी देखील पंचांनी षटकार देण्याऐवजी फलंदाजाला बाद ठरवले आणि भारताला याचा फटका बसला.