प्रतिनिधी / गुहागर
गुहागर तालुक्यातील हेदवी समुद्र किनारी असलेल्या व आकर्षणाचे ठिकाण ठरलेल्या बामन घळ येथे सेल्फी घेत असताना ठाणे येथील तरुण जोडप्याचे समुद्राच्या पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
हेदवी येथील बामणघळ सर्वांना सुपरिचित आहे आज सकाळी 11.30, 12 च्या दरम्यान हेदवी समुद्र किनारी असलेल्या बामणोलीमध्ये समुद्राच्या भरतीच्या लाटांनी पाणी शिरले होते. त्यामधून उडणाऱ्या तुषारांचा आनंद घेत स्वतःचा सेल्फी काढण्याच्या नादामध्ये समुद्राच्या लाटे बरोबर पत्नीचा बामन घळीमध्ये पत्नीचा तोल गेला, पत्नीला वाचवताना पतीचाही तोल गेल्याने तोही बामणोळी पडून या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. अनंत माणगावकर वय 36, सुचेना माणगावकर वय 33 दोघे राहणार ठाणे या जोडप्याबरोबर आई, मामेभाऊ असे चौघेजण फिरावयास ठाण्यावरून आले होते. घटनास्थळी पोलिस पाटील स्थानिक तरुण आणि गुहागर पोलीस दाखल झाले आहेत स्थानिकांच्या मदतीने दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले आहेत. नववर्षाच्या प्रारंभीच हेदवी समुद्र किनारी घडलेल्या या घटनेने पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले आहे.