बेळगाव/ प्रतिनिधी
लॉकडाऊनमुळे रोजंदारी करणाऱया कामगारांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. जीवनावश्यक साहित्य मिळविण्यासाठी आटापिटा करावा लागत आहेत. अशा गरजूंना अन्नधान्य पुरवठा करण्यासाठी संघटनांकडून मदतीचा ओघ वाढला आहे. त्यामुळे सुरक्षित अंतर ठेवले जात नाही. आवश्यक खबरदारी घेतली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्याकरिता महापालिकेच्या मुख्य कार्यालयात मदत स्वीकारून त्याचा पुरवठा गरजूंना करण्यात येत असल्याची माहिती महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी दिली.
गरजूंना अन्न पुरवठा करण्याची मोहीम महापालिकेकडून राबविण्यात येत आहे. झोपडपट्टी आणि जनता घरे तसेच रोजंदारी काम करणाऱया कामगारांना विविध साहित्याचा पुरवठा विविध संघटना आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे. गरजूंना मदत करण्यासाठी नागरिकांचा ओघ वाढला आहे. पण मदतीचे साहित्य वितरण करताना कोरोनाचा प्रसार होऊ नये याची दक्षता घेतली जात नाही. नागरिकांनी एकत्र येऊ नये, तोंडाला मास्क आणि हातात हॅण्डग्लोव्ज घालावे तसेच सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन करण्यात येत आहे. मात्र याची अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. तयार अन्न वितरित करताना नागरिकांची गर्दी होत आहे. या समस्यांचा विचार करून एकाच ठिकाणी मदत स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि समाज संघटनांनी मदतीचे साहित्य महापालिका कार्यालयातच जमा करावे असे आवाहन करण्यात आले आहे. महापालिका कार्यालयात जमा करण्यात आलेले साहित्य गरजू नागरिकांना पुरविण्यात येणार आहे. सध्या महापालिकेकडून झोपडपट्टी आणि गरजू नागरिकांना अन्नाची पाकिटे तसेच समाजकल्याण खात्याच्या वसतिगृहात असलेल्या परप्रांतीय कामगारांना जेवण देण्यात येत आहे. मिळालेल्या मदतीतून या गरजूंना खाण्या-पिण्याची सोय करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी इतरत्र थेट मदत न करता महापालिका कार्यालयात जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार महापालिकेच्या मुख्य कार्यालयात जीवनावश्यक साहित्य जमा करून घेण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. या ठिकाणी देण्यात आलेल्या साहित्याची नोंद ठेवली जात आहे. ज्या ठिकाणी साहित्याची गरज आहे याची माहिती घेतली जात आहे. गरजेनुसार नागरिकांना अन्नाच्या पाकिटांचा पुरवठा केला जात आहे. मिळालेले साहित्य गरजूंना देण्याकरिता पॅकिंग करण्यात येत आहे. महापालिका कार्यालयातील महिला कर्मचाऱयांना पॅकिंग करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मदतकार्य करण्यासाठी वेगळी यंत्रणा महापालिका प्रशासनाने निर्माण केली असून या यंत्रणेद्वारे मदतीचे साहित्य स्वीकारणे आणि गरजूंपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू आहे. ही मदत पोहोचविण्यासाठी 3 किलो तांदुळ आणि पाव किलो डाळीचे पॅकेट तयार करण्यात आले आहेत. तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने व उद्योजकांच्या वतीने देण्यात येणारी मदत ठरावीक नागरिकांनाच मिळण्याची शक्मयता आहे. त्यामुळे ही मदत सर्वांपर्यंत आणि गरजूंपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी दिली.
महापालिकेने स्थापन केलेल्या मदत केंद्रात नागरिकांनी मदत देण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी काही नागरिकांनी तांदुळ, डाळ आणि तेलाचे डबे देऊ केले आहेत. विविध साहित्यही देण्यात येत आहे. गुरुवारीही काहींनी विविध साहित्य दिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.