नवी दिल्ली / वृत्तसंस्था
लष्करी कमांडर्सची चार दिवसीय परिषद सोमवारपासून नवी दिल्लीत सुरू झाली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर त्यांनी सैन्याच्या कमांडर्सशी संवाद साधत भविष्यातील संरक्षण आव्हानांना सामोरे जाण्याच्या रणनीतीवर चर्चा केली. तसेच सरकारने सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण आणि उच्च दर्जाची शस्त्रास्त्र प्रणाली तयार करण्यासाठी पुढाकार घेतल्याचेही याप्रसंगी नमूद केले.
2020 आणि 2021 या वर्षांमध्ये अंतराळ आणि सायबर स्पेससह एरोस्पेस आणि संरक्षण उत्पादन क्षेत्रात नवीन क्षितिजे शोधली गेल्याची माहितीही त्यांनी याप्रसंगी दिली. अंतराळ सायबरस्पेस, भविष्यातील क्षमता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉक-चेन यासह एरोस्पेस आणि संरक्षण उत्पादन क्षेत्रांमध्ये देशात क्रांती होत आहे. तसेच आता भारतीय एरोस्पेस आणि संरक्षण उत्पादन क्षेत्र नवीन उंची गाठण्यासाठी सज्ज होत आहे, असेही राजनाथ सिंग म्हणाले.
निर्यातीत वाढ
गेल्या पाच वर्षात संरक्षण निर्यात 334 टक्क्मयांनी वाढली आहे असून आता भारत 75 हून अधिक देशांमध्ये विविध वस्तूंची निर्यात करत आहे. भारत सरकार संरक्षण आधुनिकीकरण आणि क्षमतांच्या विकासास पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध असून मागील वर्षाच्या तुलनेत 2021-22 च्या वार्षिक बजेटमध्ये संरक्षण भांडवल खर्च 18.75 टक्क्मयांनी वाढवले आहे. गेल्या 15 वर्षांतील ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ असल्याचे सिंग यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.