प्रतिनिधी / करमाळा
ऊस वाहतूकदारांना वाहतूक कमिशन वाढवून देणार आहे, अशी माहिती फलटण येथील स्वराज्य शुगरचे चेअरमन तथा माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.
जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी खासदार नाईक निंबाळकर यांची मंगळवारी (दि. १२) भेट घेतली. यावेळी त्यांनी ऊस वाहतूकदारांच्या समस्या व व्यथा त्यांच्यापुढे मांडल्या. त्यावर खासदार नाईक निंबाळकर यांनी मागण्या योग्य असल्याचे सांगून वाहतूक कमिशनमध्ये वाढ करणार असल्याचे घोषित केले आहे, अशी माहिती खूपसे यांनी सांगितली आहे.
डिझेलचे दर, ड्रायव्हरचा पगार व वाहनांच्या स्पेअर पार्टच्या किंमती वाढल्या आहेत. मात्र कारखानदारांकडून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांना कोणत्याही प्रकारचे वाहतूक कमिशन वाढविले नाही. यावर जनशक्ती संघटनेच्या वतीने आंदोलने सुरु आहेत. या आंदोलनाची दखल घेऊन खासदार निंबाळकर यांनी ऊस वाहतूकदारांना वाहतूक कमिशन वाढवून देणार असल्याचे जाहीर केले आहे.
जनशक्ती संघटनेचे खूपसे पाटील यांनी पंढरपूर येथे ट्रॅक्टर आंदोलन केले होते. साखर आयुक्त यांच्याशीही चर्चा केली होती. साखर आयुक्तांनी कायद्याकडे बोट करत वाहतूक कमिशन वाढवण्याबाबत कोणताच कायदा नसल्याचे सांगून कारखानदारांना फक्त विनंती करू शकतो. याबाबत आदेश देता येत नसल्याचे त्यांनी सांगितले होते. स्वराज्य शुगरचे चेअरमन निंबाळकर यांनी ऊस वाहतूक कमिशन वाढवून देणार असल्याचे जाहीर केले. मात्र इतर कारखानदारांना कधी जाग येणार? त्यांना कधी अशी सद्बुद्धी कधी सुचणार असा सवाल केला जात आहे.