पोलीस निरीक्षक श्रीकांत पाङुळे यांचा इशारा
प्रतिनिधी / करमाळा
ग्रामपंचायत निवडणूक कालावधीत गावातील वाद – विवाद टाळण्यासाठी व गावाचा विकास होण्यासाठी गावातील सर्व पक्षांनी एकत्रित बसून ग्रामपंचायत बिनविरोध काढण्यासाठी प्राधान्याने विचार करावा. तसेच गावात दखलपात्र गुन्हे होऊ नयेत यासाठी पक्षप्रमुखांनी काळजी घ्यावी व याला सर्व नागरिकांनी सहकार्य करावे. जर गुन्हा घडल्यास कुणाचीही गय न करता संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, अस इशारा करमाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी दिला.
करमाळा तालुक्यातील 51 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे. या अनुषंगाने पोथरे (ता. करमाळा) येथे कायदेविषयक सूचना देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे बोलत होते. पुढे बोलताना पोलिस निरीक्षक पाडुळे म्हणाले, निवडणूक कालावधीत मत – मतांतरे व वादविवाद होऊन दखलपात्र गुन्हे घडण्याची शक्यता असते. असे झाले तर कुणाचीही गय न करता संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच गावाचा विकास करण्यासाठी गावातील सर्व पक्षप्रमुखांनी एकत्रित बसून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्राधान्याने विचार करावा. याशिवाय 26 जानेवारीपर्यंत गावात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे. असे आवाहन करण्यात आले आहे.