महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्याची होणार कारवाई
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहक नियमित वीजबिलांचा भरणा करीत असल्याने तसेच बिलींग सायकलमुळे एरव्ही दरमहा 8 ते 9कोटी रुपयांची थकबाकी दिसून येत होती. मात्र हीच थकबाकी आता तब्बल 265 कोटी 85 लाख रुपयांवर गेली असल्यामुळे महावितरणच्या महसुली तुटमध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे.
‘कोरोना’ च्या गेल्या 10 महिन्यांच्या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील महावितरणच्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांकडे वीजबिलांची थकबाकी तब्बल 237 कोटी 20 लाखांनी वाढली आहे. त्यामुळे महावितरणच्या अस्तित्वासाठी नाईलाजाने थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई करावी लागणार आहे. वीजग्राहकांनी सहकार्य करून थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांनी केले आहे.
सोलापूर जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीमध्ये सुमारे 6 लाख 75 हजार ग्राहक आहेत. मार्च 2019 मध्ये 1 लाख 25 हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे केवळ8 कोटी 33 लाख रुपयांची थकबाकी होती. मार्च 2020मध्ये 1 लाख 91 हजार वीजग्राहकांकडे 28 कोटी 65 लाखांची थकबाकी होती. ही थकबाकी वसुल करण्यापूर्वीच मार्चमध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन सुरु झाला. तेव्हापासून वीजबिल वसुलीवर मोठा परिणाम सुरु आहे. अनलॉकनंतरही थकीत व चालू वीजबिलांचा भरणा फारसा होत नसल्याने महावितरणची आर्थिक स्थिती सध्या हलाखीची झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक वर्गवारीतील 4 लाख 46 हजार वीजग्राहकांकडे तब्बल 265 कोटी 85 लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. यात सर्वाधिक घरगुती 3 लाख 94 हजार 150 ग्राहकांकडे 189 कोटी 70 लाख, वाणिज्यिक 40 हजार 495 ग्राहकांकडे 45 कोटी 36 लाख तर औद्योगिक 9 हजार 15 ग्राहकांकडे 30 कोटी 78 लाख रुपयांची थकबाकी आहे.
गेल्या डिसेंबर 2020 पर्यंत तब्बल 237 कोटींच्या थकबाकीचा डोंगर वाढला तरी महावितरणने कोणत्याही थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केला नाही. मात्र केवळ वीजबिलांच्या वसुलीवर आर्थिक भिस्त असणाऱ्या महावितरणची स्थिती वीजखरेदी, दैनंदिन देखभाल व दुरुस्ती खर्च, कर्जांचे हप्ते, कंत्राटदारांची देणी, आस्थापनांचा खर्च भागविण्याइतपत सध्या राहिलेली नाही. त्यामुळे थकबाकीदारांना नियमाप्रमाणे नोटीस पाठवून नाईलाजाने वीजपुरवठा खंडित करण्याचा कटू कारवाई सुरु करण्यात येत आहे.
त्यामुळे सध्या सवलतीच्या रास्तदराने वीजपुरवठा सुरु असलेल्या शेतकरी, घरगुती ग्राहक, यंत्रमागधारक, छोटे व्यावसायिकांना सर्वाधिक फटका बसणार आहे. कोरोनामुळे थकबाकीचे ओझे वाढल्याने आर्थिक स्थिती सध्या अतिशय हलाखीची झाली आहे.
त्याचप्रमाणे वीजग्राहकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून चालू वीजबिल तसेच थकबाकीची रक्कम भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सोय करून देण्यात आली आहे. वीजबिलांच्या तक्रारी असल्यास त्यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना सर्व कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील वीजग्राहकांनी थकीत वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.