प्रतिनिधी / लातूर
गेल्या अनेक दिवसापासून लातूर शहरातील मुख्य रस्त्यावरील दुभाजाकामधील झाडे लावणे, तसेच त्यातील कचरा साफ करणे, पाणी देणे आदी सर्व कामे लातूर शहरातील लातूर वृक्ष टिम या स्वंयसेवी संस्थेच्या माध्यमातून अत्यंत निष्ठेने व सातत्याने केले जात आहे. परंतू महापालिका प्रशासन मात्र न केलेल्या कामाचे श्रेय लाटत असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून येत आहे. काम न करता महापालिका प्रशासनाने मात्र कोणतेही काम न करता प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून शहरातील मुख्य रस्त्यावरील झाडाचे सुशोभिकरण केल्याचे एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे सांगितले असले तरी प्रत्यक्षात मात्र महापालिकेचे कोणीही कर्मचारी त्याठिकाणी आले नाहीत. केवळ स्वंयसेवी संस्थांनी केलेल्या कामाची महापालिका प्रशासन श्रेय लाटत असल्याचे दिसून येते.
महापालिका अस्तित्वात आल्यापासून महापालिकेच्या कारभारात कोणाचा पायपस कोणाला नाही. अनेक महिन्यांपासून स्वच्छता कर्मचार्यांचा पगारही झाला नाही. अनेक कर्मचारी उपाशी पोटी काम करीत असले तरी काही महापालिका प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी मात्र उत्पन्न असलेल्या कामावर बिना पगारी काम कसे करतात हा एक संशोधनाचा विषय आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनाच्या संकटातही लातूर महापालिका प्रशासनाने कोणतेही उल्लेखनीय काम केल्याचे ऐकीवात नाही. घरोघरी जावून आरोग्य तपासणी केले असल्याचे सांगण्यात येत असले तरी बंद असलेल्या थर्मामिटरने शहरातील नागरिकांची आरोग्य तपासणी केली. यामागे मोठे गौडबंगाल आहे. लातूर महापालिकेला सर्वच स्तरावर अपयश आले आहे. लातूर शहराला पाणीपुरवठा करणार्या मांजरा धरणात मुबलक पाणीसाठा असला तरी अजुनही शहरात आठ ते दहा दिवसाला पाणीपुरवठा केला जातो. हि एक चिंतेचीच बाब आहे.
अनेक स्वंयसेवी संस्थांनी शहराला दररोज पाणीपुरवठा करावा अशी मागणी केली. परंतू या मागणीला महापालिका प्रशासनाने केराची टोपली दाखविली. शहरात अनेक ठिकाणी कचर्याचे ढिग आहेत. शहरात घंटागाडी वेळेवर नियमीत येत नाही. अशा नागरिकांच्या तक्रारी असूनही महापालिका प्रशासनाला मात्र लातूरकरांच्या सोयीचे काही देणे-घेणे नसल्याचेच चित्र दिसून येते. काही काम न करता महापालिका प्रशासन मात्र प्रसिध्दी तंत्राच्या माध्यमातून न केलेल्या कामाचे श्रेय घेत असल्याचे अश्चर्य व्यक्त होत आहे.