ग्रामीण भागातील नागरिकांची होणार सोय
प्रतिनिधी / सोलापूर
लॉकडाऊन व कोरोनाच्या भीतीमुळे दोन महिन्यांपासून बंद असलेली लालपरी बस सोमवार आठ जूनपासून ग्रामीण भागात धावणार आहे. राज्यात कोरोनाचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी 22 मार्चपासून एसटीची सेवा बंद करण्यात आली होती. परंतु कोरोनाचा प्रसार वाढत चालल्याने राज्य सरकारकडून तब्बल चार वेळा लॉकडाऊन वाढवल्यामुळे एसटीच्या सेवेवर परिणाम झाला होता. मात्र लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात काही प्रमाणात शिथिलता दिल्याने सोलापूर आगारातून देखील एसटी गाडय़ा धावण्यास सुरुवात होणार आहे.
लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात अत्यावश्यक सेवा व इतर व्यवसायाची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यानंतर जिल्हांतर्गत एसटी बस, खासगी बस सुरू करण्यास देखील मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूर डेपोमधून ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी एसटी गाडय़ा धावणार आहेत. यामध्ये भंडारकवठे, अक्कलकोट, खानापूर, बार्शी, पंढरपूर, तिऱहे मार्गे पंढरपूर, वडापूर अशा एसटीच्या फेऱया सुरू होणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी दिली.
सोलापूर डेपोमधून एसटी सुरू होणार असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांची सोय होणार आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून एसटीच्या फेऱया वाढविण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात आले. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून थांबलेली लालपरी आजपासून प्रवाशांच्या सेवेत पुन्हा दाखल झाली आहे. प्रत्येक गाडीत 22 प्रवासी असणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना गाडीत प्रवेश देत असताना सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझर, थर्मल स्क्रीनिंग करूनच प्रवेश दिला जाणार आहे.
या मार्गावर धावणार एसटी
भंडारकवठे, अक्कलकोट, खानापूर, बार्शी, पंढरपूर, तिऱहे मार्गे पंढरपूर, वडापूर
मागील दोन महिन्यांपासून एसटीची सेवा बंद होती. मात्र आजपासून ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी पुन्हा एसटी बस सुरू झाली आहे. त्यामुळे याला प्रतिसाद पाहून यामध्ये वाढ करण्यात येणार आहे. अशी माहिती रमाकांत गायकवाड, विभाग नियंत्रक, सोलापूर यांनी दिली.