मिलिंद शंभरकर यांची माहिती : नऊ गावात नऊ दिवसांची संचारबंदी : मानाच्या दहा पालख्यांना परवानगी
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर :
आगामी आषाढी वारीनिमित्त पंढरपूर आणि पंढरपूर परिसरातील नऊ गावात नऊ दिवस कडक संचारबंदी लागू करण्यात आली असून, या परिसरात विविध बंधने घालण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. कोरोना पार्श्वभूमीवर आषाढी वारीत गर्दी होऊ नये, यासाठी शनिवारी 17 जुलै दुपारी दोन वाजल्यापासून रविवारी 25 जुलै 4 वाजेपर्यंत पंढरपूर परिसरात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी म्हणाले, यात्राकाळात प्रथा तसेच मंदिरातील विविध धार्मिक विधी परंपरा जपण्याच्या दृष्टीने शासनाने परवानगी दिली आहे. आषाढी एकादशी यांचा 20 जुलैला आहे तर 11 तारखेपासून 28 जुलै पर्यंत पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. मानाच्या दहा पालख्या प्रत्येकी 40 वारकऱ्यांचा 19 जुलै रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत वाखरी येथे एसटी बसने येतील. त्यांचा तीन किलोमीटरच्या वाखरी ते विसावा मंदिर इसबावी हा प्रवास चालत प्रत्येक पालखीसोबत दोन मानकरी करतील. तर बाकीचे वारकरी एसटीने येतील. 19 जुलै रोजी पालख्या पंढरपुरात आल्यानंतर परतीचा प्रवास दिनांक 24 जुलै रोजी सुरू होणार आहे. या काळात पंढरपुरातील एसटी तसेच खासगी प्रवासी वाहतूक बंद राहणार आहे. तर 18 ते 25 जुलै या काळात वारकऱयांना चंद्रभागेत स्नान करण्यास ही बंदी घालण्यात आली आहे.
यावेळी पोलीस अधीक्षक ग्रामीण तेजस्विनी सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे आदी उपस्थित होते.
या गावातही संचारबंदी लागू
पंढरपूरसह भांडुबरे, चिंचोली भोसे, शेगावदुमाला, लक्ष्मी टाकळी, गोपाळपूर, वाखरी, कोर्टी, गादेगाव, शिरढोण, कौठानी या नऊ गावातही संचारबंदी लागू राहील.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा
शासकीय महापूजा 20 जुलै रोजी पहाटे अडीच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मंदिरात फक्त पन्नास लोक उपस्थित असतील. तसेच वारीकाळात येणाऱया मानाच्या पालखी सोहळÎातील वारकऱयांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.