सोन्याच्या `कोंबडी’साठी मोर्चेबांधणी, मालकशाही बळकट असल्याची चर्चा
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
दोन वर्षांच्या सभापती पदाच्या कार्यकाळानंतर पुन्हा खांदेपालट करण्याच्या उद्देशाने एकत्र आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकीची हाक दिली. पण बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकरणात अद्याप कोणताही ठोस निर्णय समोर आला नसल्याने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बदल होणार का याबाबतची चर्चा आता सुरू झाली आहे. बाजार समितीरुपी सोन्याची कोंबडी ताब्यात घेण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी होत असली तरी मालकशाही बळकट असल्याची चर्चा सुरू आहे.
उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर कार्यक्षेत्र असलेल्या बाजार समितीची वार्षिक उलाढाल सोळाशे ते अठराशे कोटींची तर उत्पन्न 23 कोटी 60 लाख 65 हजार 744 रुपये आहे. तसेच निव्वळ वाढावा हा आठ कोटी 34 लाख 29 हजार 894 रुपये इतका आहे. वाशी, पुणे नंतर राज्यात तिसऱया क्रमांकाची बाजारपेठ म्हणून सोलापूर बाजार समितीचा लौकिक आहे. राजकारणासाठी बाजार समितीच्या किल्ल्या हातात असणे गरजेचे आहे. हे पक्षीय राजकारणातील दिग्गजांना चांगलेच ठाऊक असल्याने बाजारपेठेची सत्ता आपल्याच हाती असावी यासाठीच प्रत्येकजण प्रयत्नशील असल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून बाजार समितीतील बदल करणार असा ठेका कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी धरला आहे. त्यासाठी दक्षिण आणि उत्तर सोलापुरातील मातब्बर राजकारण्यांच्या बैठकावर बैठका होत आहेत. परंतु, म्हणावे तसे यश त्यांच्या पदरी अद्याप तरी पडल्याचे दिसत नाही.
बाजार समितीतील सध्याची मालकशाही एकूणच स्ट्राँग असल्याचे बोलले जात असले तरी बदलाचे वारेही जोरात असल्याची चर्चाही दबक्या आवाजात सुरू आहे. त्यासाठी ठराविक समाजाचे कार्ड वापरण्याची तयारीही दाखविली जात आहे. अविश्वास ठराव आणण्यासाठी जोरदार तयारी केली जात असल्याचे कळते, परंतु, या तयारीला पुष्टी देणारी हालचाल दिसून येत नसल्याची बाब सत्ताधाऱ्यांचा आत्मविश्वास वाढविणारी ठरत असल्याचेही सांगितले जात आहे. या परिस्थितीत बाजार समितीतील व्यापाऱयांची भूमिका सावध असल्याचे दिसून येत आहे. हे मालक किंवा ते मालक आम्हाला सारखेच अशी चर्चा व्यापाऱ्यांमध्ये आहे. सभापती विजयकुमार देशमुख यांनी राजीनामा न दिल्यास अविश्वास ठराव आणण्यात येणार अशी चर्चा होती. हे मालकांनी फार मनावर घेतलेले दिसून येत नाही. त्यांना दिलेल्या अल्टिमेटची वेळही संपली. मात्र अविश्वासाच्या ठरावाचे ढग काही केल्या एकत्र येत नसल्यसाचेच पाहावयास मिळत आहे. एकूणच अविश्वास ठरावाची चर्चा हवेतच विरत चालल्याने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बदलाचा चमत्कार घडणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गटातटाची किनार असल्यानेच कर्मचाऱयांत धुसफूस
बाजार समितीत विविध विभाग कार्यरत आहेत. प्रत्येक विभागात पदनिहाय अनेक व्यक्ती काम करतात. त्यांच्याकडून विविध विभागातील कामकाज हाताळले जाते. ते व्यवस्थितरीत्या हाताळले जात नसल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. एकूणच बाजार समिती सभापतीपदापेक्षाही जास्त धुसफूस कर्मचाऱ्यांमध्ये असल्याची चर्चाही जोरात सुरू आहे. याला गटातटाची किनार असल्याने हा प्रकार सर्रास होत असल्याचेही सांगितले जाते.