तरुण भारत संवाद प्रतिनिधी / मोहोळ
तालुक्यात बिबट्याचा वावर असल्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. त्यामुळे ते रात्रीच्या वेळी घराबाहेर पडत नाहीत, याचाच गैरफायदा घेत चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या मोटारी व घरापुढील साहित्य चोरण्याचा सपाटाच लावला आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. लवकरात लवकर या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील शिरापूर येथे बिबट्याने दोन जर्सी गाईच्या वासरांचा फडशा पाडला. त्यामुळे वनविभागाने या भागात त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता आणि शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी घराच्या बाहेर पडू नका, हातात बॅटरी किंवा शस्त्र घेऊन फिरण्याच्या सूचना केल्यामुळे शेतकरी भयभीत होऊन घराच्या बाहेर पडत नाहीत. याचा गैरफायदा चोरट्यांनी घेतला आहे. बिबट्याच्या भीतीमुळे शेताची राखण न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोटारी चोरटे नेऊ लागले आहेत. काही मोटारीतील तांबे काढून त्या मोटारी तेथेच टाकून जात आहेत. याचबरोबर चोरट्यांनी घरासमोर बांधलेल्या शेळ्या व अन्य साहित्य चोरून नेण्याचा सपाटाच लावला आहे.
आतापर्यंत साहित्य चोरीच्या तक्रारी गावातील सुधाकर चितळे, कुलदीप शेंडगे, साईनाथ शिंदे, संजय शिंदे यांनी दिल्या आहेत. पोलिसांनी या भागातील गस्त वाढवावी आणि चोरट्यांचा जेरबंद करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.