वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन
तरूण भारत संवाद प्रतिनिधी / अक्कलकोट
राज्यात सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गावानां होणाऱ्या पूर परिस्थितीच्या त्रासाबाबत शासनाने दक्षता घ्यावी. लवकरात लवकर शासनाने नुकसानीचे पॅकेज जाहीर करावे. पूरग्रस्तांना तातडीने दोन ते तीन हजार रुपयांची अन्नधान्यासाठी मदत शासनाने करावी. पूरग्रस्तांचे अन्नधान्य भिजलेले आहे. शासनाने पर कुटुंबांना अन्नधान्य वाटप करावे. रब्बी हंगामातील पेरणीसाठी शेतकरी बांधवांना बी-बियाणे, खते, कीटकनाशक औषधे शासनाने मोफत द्यावी .यामुळे त्यांचे आयुष्य उभे राहण्यास मदत होणार आहे. अन्यथा कोरोनामुळे शहरे, गावे बंद झाली. आता पुरामुळे यांचे आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही याची दक्षता शासनाने घ्यावी असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बु. या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाल्यामुळे व त्याचबरोबर शेतीचे सर्व पिके नासधूस झाल्यामुळे याची पाहणी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गावाला भेट दिली. या भेटीच्या माध्यमातून पूरग्रस्तांना व अतिवृष्टीधारक शेतकरी व ग्रामस्थांशीं प्रकाश आंबेडकर यांनी संवाद साधला. कालच्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत लोकांनी प्रश्न उपस्थित करुन आमचे मूळ प्रश्न न ऐकताच मुख्यमंत्री निघून गेले अशी भावना प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर व्यक्त केली. तसेच शासनाकडून आम्हाला न्याय मिळावा अशी भावना लोकांनी व्यक्त केली. पुराची परिस्थिती असेल तर पुनर्वसनासाठी आपण पाठपुरावा करू असे आश्वासन प्रकाश आंबेडकर यांनी दिले. त्याचबरोबर त्यांनी आपण मुख्यमंत्र्यांना भेटून चर्चा करणार आहोत असे सांगितले.
यावेळी सांगवी गावातील महिलांनी आपल्या व्यथा मांडल्या. आपणच आमचे माय बाप आहोत. आम्हाला न्याय द्या अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी प्रदेश प्रवक्ता आनंद चंदनशिवे, जिल्हाध्यक्ष नाना कदम, जिल्हा कार्याध्यक्ष बबन शिंदे, तालुका अध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, शीलामनी बनसोडे, संदीप मडिखांबे, ज्योतिर्लिंग स्वामी, देवानंद अस्वले, राहुल मोरे, आनंद मोरे, सुभाष ओहळ, तुकाराम पारसे, रवी पोटे, बबन गायकवाड, गौतम गायकवाड, नितीन शिवशरण, गौतम बाळशंकर आदींसह ग्रामस्थ, कार्यकर्ते उपस्थित होते.