बार्शी / तरुण भारत संवाद प्रतिनिधी
कोरोना महामारी मुळे सर्व शाळा महाविद्यालये मागील आठ महिन्यांपासून बंद आहेत. महाविद्यालयाचे वर्ग ऑनलाइन सुरू असल्याने प्रत्यक्षिकाचा भाग म्हणून तसेच परिसरातील शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध माहिती व्हावी म्हणून येथील कृषी महाविद्यालयीन विद्यार्थिनी स्मिता मोहन शेळके हिने प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्याचे काम लॉकडाऊन मध्ये केले.
केवळ पुस्तकी ज्ञानातून शेती समजून त्यावर अमल करण्या ऐवजी प्रत्यक्ष शेतावर जाऊन जमीन, हवामान, पाण्याची उपलब्धता, मार्केट याचा विचार करून परवडेल असेच पीक व कृषीपूरक उद्योग केल्यास शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नक्की सुधारेल यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात त्यांच्या समस्या जाऊन घेऊन जाऊन मार्गदर्शन आवश्यक असल्याचे स्मिता शेळके यांनी म्हंटले आहे.
राहुरी कृषी विद्यापीठ अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या ग्रामीण कृषी कार्यक्रमा अंतर्गत शासकीय कृषी महाविद्यालय पुणे येथील विद्यार्थिनी स्मिता शेळके हिने
बार्शी तालुक्यातील शेलगाव (मा) येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या मध्ये तिने मृदा परीक्षणासाठी मातीचे नामुमे कशा पद्धतींने घ्यावे याचे प्रात्यक्षिक दाखवत मृदा परिक्षणाचे महत्व शेतकऱ्यांना समजावून सांगितले. तसेच बीज प्रक्रिया, चारा प्रक्रिया, खत व्यवस्थापन आदींवर प्रात्यक्षिक सादर करून त्याचे महत्व पटवून दिले. यासाठी कृषी महाविद्यालय पुणे येथील सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस डी मासाळकर, कार्यक्रम समन्वयक डॉ. व्ही डी तरडे, कार्यक्रम चेअरमन डॉ. एन एन वाघमारे, कार्यक्रम अधिकारी डॉ. जे एस कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले.