प्रतिनिधी / बार्शी
कोरोना विषाणू संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी देशासह महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन पुकारले होते या लॉकडाऊन काळातील आठ महिन्याचे घरगुती वीज बिल 50% माफ करावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांनी तहसीलदार बार्शी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी शहराध्यक्ष एडवोकेट अविनाश गायकवाड, युवक तालुकाध्यक्ष अमोल कांबळे, तालुका अध्यक्ष दत्तात्रय शिरसागर, वैराग विभाग प्रमुख विकास बनसोडे, युवक सरचिटणीस रविराज बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष नाना कांबळे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनानुसार लॉकडाऊन काळातील आठ महिन्याचे घरगुती वीज बिल पन्नास टक्के माफ करावे. कोरोनाच्या संसर्गामुळे सामान्य नागरिक भरडला आहे आणि या संकटाच्या काळामध्ये नागरिकांच्या पाठीशी उभे राहणे हे राज्य सरकारचे कर्तव्य असून सामान्य जनतेला यामुळे कोणताही कामधंदा नसल्यामुळे लाईट बिलाचा बोजा वाढला आहे तसेच अंदाजे व चुकीची बिले देण्यात आली असल्याने चुकीची दिलेली बिले दुरुस्त करावीत व जनतेची सरसकट पन्नास टक्के वीज बिल माफ करावे असे म्हटले आहे. लॉकडाऊन काळातील पन्नास टक्के वीज बिल माफ करण्याची रिपाईने मागणी केली.