बार्शी / तरुण भारत संवाद प्रतिनिधी
बार्शी तालुक्यातील सर्वात मोठे गाव व ग्रामपंचायत समजले जाणारे वैराग या ठिकाणी आता ग्रामपंचायत ऐवजी नगरपंचायत स्थापण्याचे हालचाली मंत्रालयातून सुरू झालेले आहेत. याबाबत नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन यांनी जिल्हा प्रशासन अधिकारी यांना पत्र लिहून कळविले आहे की वैराग या ग्रामपंचायत चा बदल नगरपंचायती मध्ये झाल्यानंतर या नगरपंचायती मध्ये समाविष्ट करावयाचे क्षेत्र, सर्वे क्रमांकाची यादी, तसेच क्षेत्रातील स्थानिक क्षेत्राच्या संक्रमण हद्दीचा तपशील पाठविण्याबाबत चे पत्र वैराग ग्रामपंचायतीला पाठवले आहे. आता वैराग ग्रामपंचायत नगरपंचायती मध्ये रूपांतर झाल्यानंतर वैराग या भागाच्या विकासाला गती मात्र येणार हे नक्की आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वैराग ग्रामपंचायतीने 23 मार्च 2019 रोजी वैराग ग्रामपंचायतीचा नगर पंचायतीमध्ये रूपांतरित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे पाठविण्यात आला होता, त्यानंतर 23 मार्च 2019 रोजी वैराग ग्रामपंचायतीने तसा ठरावही मंजूर केलेला होता हा प्रस्ताव व ठरावाची प्रत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाला पोहोचल्यानंतर मंत्रालयातून आता वैराग ग्रामपंचायत नगरपंचायती मध्ये रुपांतरीत करण्याच्या गतीला वेग आला आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने जिल्हाधिकारी सोलापूर यांना पत्र पाठवून वैराग ग्रामपंचायती बाबतची माहिती घेतली आहे. या मागितलेल्या माहितीमध्ये वैराग ग्रामपंचायत चे रूपांतर नगरपंचायती मध्ये करावयाचे झाल्यास वैराग क्षेत्रातील सिटी सर्वे नंबर तसेच वैराग नगरपंचायत झाल्यानंतर संक्रमित होणाऱ्या भूभागाची माहिती मागविण्यात आली आहे तरी ही माहिती तात्काळ सादर करण्याचे आदेशही सोलापूर जिल्हाधिकारी यांनी वैराग ग्रामपंचायतीला दिले आहेत आहेत. याबाबत सोलापूर नगररचना विभागाचे पंकज जावळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की सदर वैराग येथील ग्रामपंचायत नगरपंचायती मध्ये रूपांतरित करण्याचा प्रस्ताव या ग्रामपंचायतीने शासनाला दिला होता शासनाने आमच्या कार्यालयाशी जी माहिती मागितली आहे ती माहिती देण्यासंदर्भात वैराग ग्रामपंचायतीला सूचित केले आहे. या भागाची सर्वात मोठी मागणी म्हणजे वैराग तालुका व्हावा व नगरपंचायत व्हावी यापैकी आता नगरपंचायतीची मागणी पूर्ण होत असून वैराग भागांमध्ये समाधानाचे चित्र पाहायला मिळत आहे तर लवकरच वैराग या गावाची तालुका निर्मिती होईल अशी आशा वैराग वासीय बाळगून आहेत.