कामाच्या हादऱ्याने घरांच्या भिंतींना तडे कंपनीच्या अधिकाऱ्यास धरले धारेवर
सरवडे प्रतिनिधी
काळम्मावाडी थेट पाईपलाईनचे सोळांकूर गावात सुरू झालेले काम ग्रामस्थांनी बंद पाडले. याठिकाणी ३६ मीटरच्या कामात सहा घराच्या भिंतींना तडे गेले आहेत. यामुळे लोकांनी मुख्य रस्त्यावरून पाईप घालूच नये असा आग्रह धरला तर कोल्हापूर महानगरपालिकेने नुकसान भरपाईचे पत्र दाखवावे मगच काम सुरू करावे अशी मागणी करत कंपनीच्या अधिकाऱ्याला धारेवर धरले. महानगरपालिकेचे अधिकारी आज या ठिकाणी फिरकलेच नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांच्यासह स्थानिक नेत्यांना लोकांच्या रोषांला सामोरे जावे लागले.
४८५ कोटीच्या थेट पाईप योजनेचे पाईप टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून गावातील मुख्य रस्त्यावरून दोन दिवसापासून २६० मीटर पैकी ३६ मीटरचे काम पूर्ण झाले आहे. या मुख्य रस्त्यावर सहा महिन्यापूर्वी पाच फूट भरावा करून त्यावर सुमारे दोन ते अडीच फुटाचे आरसीसी रस्ता केलेला होता. थेट पाईप साठी आरसीसी रस्ता ब्रेकर फोडून काम सुरु केले होते. ब्रेकरच्या हादऱ्यानै बळवंत शिंदे ,प्रकाश ढोकरे, राजलक्ष्मी नारकर, रघुनाथ नारकर ,मारुती मुधोळकर, केरबा पाटील यांच्या घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. यामुळे लोकांच्यात संतापाची लाट उसळली.आज सकाळी मुख्य रस्त्यावरील ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत काम बंद पाडले. काम बंद पाडण्यात महिला अग्रभागी होत्या . गावाच्या बाहेरून पाईप लाईनची कामे व्हावीत अशी मागणी ग्रामस्थ करत होते.
यावेळी झालेल्या चर्चेत शोभा गुरव ,सुमन पाटील, अनुजा कारेकर, मंगल शिंदे ,राजलक्ष्मी नारकर, यांच्यासह ए. टी. पाटील, विश्वास पाटील, प्रकाश ढोकरे , मुकुंद पाणारी, एस. टी. पानारी, विलास धावरे, शिवानंद महाजन यांनी सहभाग घेतला.
याबाबत सरपंच आर.वाय. पाटील म्हणाले,थेट पाईप लाईनची तहसीलदार व नगरपालिकेचे अधिकारी यांची बैठक झाली होती. ग्रामपंचायतीला कामाबाबत अथवा नुकसानीबाबत कोणतेही पत्र नगरपालिकेने दिलेले नाही.
जी. के. सी. कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर राजेंद्र माळी म्हणाले, काम सुरू करण्यापूर्वी ग्रामपंचायतीला होणाऱ्या नुकसानी भरपाई बाबत पत्र दिले आहे.नुकसानी बाबत खात्री करून निर्णय घेण्यात येईल.