पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भारतातील अव्वल क्रीडापटूंशी संवाद , विराट कोहली-पीव्ही सिंधू यांच्याकडून प्रामुख्याने अपेक्षा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोव्हिड-19 च्या वाढत्या धोक्याची चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील अव्वल खेळाडूंशी संपर्क साधला आणि सोशल डिस्टन्सिंगबद्दल आपल्या परीने व्यापक जनजागृती करावी, असे आवाहन केले. मोदींनी शुक्रवारी भारतीय खेळाडूंशी व्हीडिओ कॉलद्वारे संवाद साधला. क्रिकेट आयकॉन विराट कोहली व आघाडीची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू यांचा यात प्रामुख्याने समावेश राहिला.
क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्यासह सुमारे 40 ऍथलिटस्नी सुमारे तासभर चाललेल्या या व्हीडिओ कॉलमध्ये सहभाग घेतला. सकाळी 11 वाजता या व्हीडिओ कॉलला सुरुवात झाली. भारतात सध्या 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरु असून कोरोना व्हायरसचा बीमोड करण्यासाठी विविध स्तरावरुन शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. खेळाडूंनी सोशल डिस्टन्सिंग व वैयक्तिक स्वच्छता याबाबत जनजागृती करावी, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले. भारतात कोव्हिड-19 पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या 2 हजारांवर पोहोचली आहे.
‘आपल्या सर्व सूचनांची गांभीर्याने नोंद घेतली जाईल. आम्ही कोव्हिड-19 विरुद्ध टीम इंडियाप्रमाणे लढत आहोत. तुम्ही दिलेल्या प्रेरणेमुळे भारतात व्यापक जनजागृती होईल’, असे पंतप्रधान मोदी यांनी ऍथलिट्सना संबोधताना नमूद केले. विश्व चॅम्पियनशिपमधील कांस्यजेता बी. साई प्रणितने याबाबतची क्लिप यावेळी पोस्ट केली. तो स्वतः या कॉन्फरन्स कॉलमध्ये सहभागी झाला होता.
सध्याच्या घडीला भारतातील सर्व क्रीडा स्पर्धा ठप्प झाल्या असून त्यांना नव्याने सुरुवात केव्हा होईल, याबाबत काहीही निश्चिती नाही. बहुप्रतिक्षित आयपीएल स्पर्धा दि. 15 एप्रिलपर्यंत निलंबित असून यासाठी अवघ्या 11 दिवसांचा कालावधी बाकी राहिला असला तरी पुढील घोषणेची प्रतीक्षा आहे.
सौरभ गांगुलीचाही सहभाग
शुक्रवारी सकाळी वृत्तसंस्थेने पंतप्रधान मोदींशी होणाऱया चर्चेबाबत व आयपीएलबाबत बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्याशी संपर्क साधला. मात्र, गांगुली यांनी अधिक तपशील देणे टाळत आपण पंतप्रधानांच्या व्हीडिओ कॉलमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले.
‘व्हीडीओ कॉलमध्ये सहभागी 40 पैकी 12 ऍथलिट्सना प्रत्येकी
3 मिनिटांच्या अवधीत आपले मत मांडण्याची संधी देण्यात आली’, असे केंद्रीय सूत्राने
नमूद केले. पण, ते 12 खेळाडू कोण, याचा तपशील दिला गेला नाही. सचिन तेंडुलकर, सौरभ
गांगुली, एमसी मेरी कोम व विराट कोहली यांचा त्यात समावेश होता, अशी माहिती नंतर मिळाली.
सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेली आघाडीची महिला मुष्टियोद्धा एमसी मेरी कोम मात्र नेटवर्कच्या
अडचणीमुळे या व्हीडिओ कॉलमध्ये सहभागी होऊ शकली
नाही.
माजी वर्ल्ड चॅम्पियन वेटलिफ्टर मिराबाई चानू या व्हीडिओ कॉलला उपस्थित होती. पंतप्रधान मोदी यांनी कोव्हिड-19 च्या या लढय़ात प्रत्येकाने सहभागी होण्याचे आवाहन केल्याचे ती म्हणाली.
लढवय्या विराटचा आवर्जून उल्लेख
‘पंतप्रधान मोदी यांनी सोशल डिस्टन्सिंग व वैयक्तिक स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याची सूचना आम्हा खेळाडूंना दिली. शिवाय, हे युद्ध जिंकण्यासाठी विराट कोहलीच्या लढवय्या प्रवृत्तीची आपल्या सर्वांना कशी गरज आहे, हे देखील विशद केले’, असे अनुभवी टेबलटेनिसपटू शरथ कमल म्हणाला. खेळाडूंनी स्वतः सकारात्मक रहावे आणि सकारात्मकता पसरवावी, असे आवाहन पंतप्रधानांनी केल्याचे वर्ल्ड चॅम्पियनशिप रौप्यजेता नेमबाज अभिषेक वर्मा म्हणाला.
‘कोव्हिड-19 विरुद्ध लढय़ात जे आघाडीवर लढत आहेत, त्यांचे आपण कौतुक करायला हवे. आपली स्वतःची, आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या आणि ही परिस्थिती कशी हाताळावी, याबद्दल आपली जी मते, सूचना आहेत, त्या ईमेलच्या माध्यमातून कळवावे, असे पंतप्रधान म्हणाले’, याचा उल्लेख अभिषेकने पुढे केला.
आव्हानांचा सामना करणे, स्वतःला शिस्त लावणे, सकारात्मकतेवर भर देणे आणि स्वतःवर विश्वास ठेवणे, स्वतःचे मनोबल उंचावणे, हे कोणत्याही खेळात महत्त्वाचे असते, तेच कोरोनाचा मुकाबला करतानाही महत्त्वाचे ठरणार आहे, असे पंतप्रधान खेळाडूंच्या या चमूला उद्देशून म्हणाले. सध्याच्या घडीला कोव्हिड-19 च्या प्रकोपामुळे अवघे क्रीडा विश्व जणू ठप्प झाले असून अनेक स्पर्धा लांबणीवर टाकल्या गेल्या आहेत किंवा रद्द केल्या गेल्या आहेत.
काही स्पर्धा रद्द, काही लांबणीवर
टोकियो ऑलिम्पिक, युरो फुटबॉल चॅम्पियनशिप लांबणीवर टाकले गेले आहेत तर दुसऱया महायुद्धानंतर प्रथमच विम्बल्डनची एखादी आवृत्ती रद्द करावी लागण्याची नामुष्की आयोजकांवर आली. कोरोना व्हायरसमुळे भारतात आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू झाला असून जागतिक स्तरावर हा आकडा 50 हजारच्या वर पोहोचला आहे. भारतातील 21 दिवसांचे लॉकडाऊन दि. 14 एप्रिल रोजी संपणार आहे.
14 पर्यंत नव्हे, त्यानंतरही लढा सुरुच राहील : सचिन तेंडुलकर
पूर्ण देशात दि. 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. पण, त्यानंतर देखील हा लढा संपलेला नसेल. आपल्याला हा लढा त्यापुढेही लढावाच लागेल. दि. 14 एप्रिलनंतरचा कालावधी विशेष महत्त्वाचा राहील, असे मला वाटत होते, त्याचाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील उल्लेख केला, असे प्रतिपादन सचिन तेंडुलकरने केले. मोदी यांच्याशी व्हीडिओ कॉलवरुन संवाद साधल्यानंतर त्या पार्श्वभूमीवर तो बोलत होता. अन्य सर्वांप्रमाणेच सचिन स्वतःही सोशल डिस्टन्सिंगवर भर देत असून आपण हस्तांदोलन करण्याऐवजी नमस्ते करतो, असे तो म्हणाला.
‘लॉकडाऊनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आपण परिस्थिती कशी हाताळतो, हे विशेष महत्त्वाचे असणार आहे. अगदी लॉकडाऊन झाल्यानंतर, या विषाणू प्रकोपातून बाहेर पडल्यानंतर देखील आपण हस्तांदोलन टाळायला हवे, असे मी सूचवले आहे. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी आपल्यातील ज्येष्ठांची अधिक काळजी घ्यावी, असे सूचित केले’, याचा सचिनने येथे उल्लेख केला.
सुमारे तासभर चाललेल्या या व्हीडिओ कॉलमध्ये खंबीर मनोवृत्ती अशा संकटात किती महत्त्वाची असते, हे देखील पंतप्रधानांनी सांगितल्याचे सचिन म्हणाला.
‘लॉकडाऊनच्या कालावधीत मनाची तंदुरुस्ती आणि शरीराची तंदुरुस्ती देखील महत्त्वाची असेल, यावर आम्हा सर्वांची चर्चा झाली. स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी मी घरी काय करतो, याची मी माहिती दिली. ही वेळ पूर्ण देशाने एकत्र येण्याची असून ज्याप्रमाणे लढाऊ मनोवृत्ती एखादा सामना जिंकून देते, त्याप्रमाणे आपल्या देशाने देखील एकसंघतेने हा लढा लढायला हवा’, असे सचिनने नमूद केले.
सचिन, विराट, रोहितसह अव्वल खेळाडूंचा सहभाग
क्रिकेट वर्तुळातील बहुतांशी दिग्गजांनी यात आवर्जून सहभाग घेतला. सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, विराट कोहलीसह अव्वल फलंदाज रोहित शर्मा, माजी जलद गोलंदाज झहीर खान, युवराज सिंग यांचा यात समावेश राहिला. विश्वचषक विजेता माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी व केएल राहुल यांचाही या यादीत समावेश होता. पण, ते यात सहभागी होऊ शकले नसल्याची माहिती देण्यात आली.
बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, भालाफेकपटू नीरज चोप्रा, पाचवेळचा माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंद, धावपटू हिमा दास, स्टार मुष्टियोद्धा अमित पांघल, महिला मल्ल विनेश फोगट, महिला नेमबाज मनू भाकर, टेटेपटू अचंता शरथ कमल यांनी या व्हीडिओ कॉलमध्ये सहभाग घेतला.