वार्ताहर / सौंदलगा
सौंदलगा येथे रब्बी हंगामातील कांदा काढणीस काही ठिकाणी सुरुवात झाली आहे. पण उत्पादनात घट झाल्याने शेतकरी निराश दिसत आहे. सध्या बेंगळूर येथे यशवंतपूर मार्केटमध्ये चांगल्या कांद्याचा दर प्रति क्विंटल 4600 ते 5000 रुपये दरम्यान आहे. मात्र उत्पादनात घट झाल्याने शेतकऱयांना चांगला दर असूनही म्हणावा तितका लाभ झाल्याचे दिसून येत नाही.
सौंदलगा परिसर हा कांदा पिकासाठी प्रसिद्ध आहे. सुरुवातीला या गावातून 300 ते 400 ट्रक कांदा बेंगळूर बाजारपेठेत जात होता. कालांतराने हवामानात झालेले प्रतिकूल बदल, वाढलेली मजुरी, खतांच्या भरमसाठ वाढलेल्या किंमती तसेच वाढलेला वाहतुकीचा खर्च या सर्वांचा परिणाम सौंदलगासह परिसरातील कांदा उत्पादनात घट होत गेली. कांदा उत्पादन घेताना इतका सारा खर्च करुन दरातील तफावत, सुरुवातीला असणाऱया दराचा प्रारंभी दोन-चार शेतकऱयांनाच लाभ त्यानंतर दरात घसरण होत असे. त्यामुळे कांदा पिकाकडे पाठ फिरवत अन्य पिकांकडे मोर्चा वळविला.
गतवर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्याचा परिणाम घाऊक बाजारात कांद्याच्या किंमतीत 100 ते 200 रुपये प्रतिकिलोपर्यंत गेला. दरम्यान वाढलेला कांदा दर पाहत सौंदलगा भागात काही शेतकऱयांनी लवकर कांदा लावून लवकर काढण्याचा प्रयत्न केला. यातून नफा मिळविण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र हवामानाची योग्य साथ न मिळाल्याने कांदा उत्पादनात घट झाली आहे. यामुळे वाढीव दर असतानाही उत्पादन घटल्याने शेतकऱयांच्या पदरी पुन्हा निराशाच येत आहे.
कांदा उत्पादनात निम्म्याने घट
सागर मारुती चौगुले यांनी आपल्या 12 गुंठे क्षेत्रात कांदा लागवड केली होती. या क्षेत्रात 50 पिशवी कांदा उत्पादन अपेक्षित होते. असते असताना 25 पिशवीच कांदा उत्पादन निघाले. एका पिशवीत सुमारे 35 ते 45 किलो कांदा असतो. याचा अर्थ उत्पादन निम्म्यावर आले आहे. त्याशिवाय डिझेलच्या दरात वाढ झाल्याने ट्रक भाडे वाढले आहे. तसेच वाढत्या महागाईने उत्पादन खर्चही अधिक आला आहे. यामुळे कांद्याला वाढीव दर मिळूनही पदरी निराशाच आली आहे. समाधानाची बाब म्हणजे यंदा कांद्याला दर मात्र चांगला मिळाल्याचे समाधानही त्यांनी व्यक्त केले.