राजकोट / वृत्तसंस्था :
बंगालचा नाबाद अर्धशतकवीर अनुस्तुप मजूमदार सौराष्ट्राच्या व रणजी चषक जेतेपदाच्या मध्ये ठाण मांडून उभा असून रणजी चषक स्पर्धेतील येथील अंतिम लढतीच्या शेवटच्या दिवशी आज बंगालला निर्णायक आघाडीसाठी 72 धावांची गरज आहे. सौराष्ट्राने सर्वबाद 425 धावा जमवल्यानंतर बंगालने गुरुवारी सामन्याच्या चौथ्या दिवसअखेर 6 बाद 354 धावांपर्यंत मजल मारली असून पहिल्या डावाअखेर आघाडी घेणे हे त्यांचे मुख्य लक्ष्य असेल.
अनुस्तुप मजूमदार 134 चेंडूत 8 चौकारांसह 58 धावांवर खेळत असून त्याच्यावरच बंगालची मुख्य भिस्त असणार आहे. मजूमदारने येथे अर्णब नंदीसमवेत सातव्या गडय़ासाठी 91 धावांची अभेद्य भागीदारी साकारत झुंजार खेळ साकारला. अर्णब नंदी 82 चेंडूत 3 चौकार, 1 षटकारासह 28 धावांवर खेळत आहे. जयदेव उनादकटचा एक चेंडू बोटावर आदळल्यानंतर देखील अर्णबने केलेला संघर्ष लक्षवेधी ठरला.
यापूर्वी, उपांत्यपूर्व व उपांत्य फेरीत देखील अनुस्तुप मजूमदारनेच बंगालला विजयपथावर आणले होते आणि आताही अंतिम लढतीत तोच बंगालसाठी मुख्य आधारस्तंभ आहे. मजूमदार व अर्णब यांनी सायंकाळच्या पूर्ण सत्रात नेटाने किल्ला लढवला आणि यजमान सौराष्ट्रावर चांगलेच दडपण आणले.
सौराष्ट्राचे खराब क्षेत्ररक्षण
यजमान संघाचे खराब क्षेत्ररक्षण देखील बंगालच्या पथ्यावरच पडले. गुरुवारी दिवसातील शेवटच्या सत्रात बंगालने 90 धावांची भर घातली. अनुस्तुपला अवघ्या 10 धावांवर हार्विक देसाईने पहिल्या स्लीपमध्ये दिलेले जीवदान सौराष्ट्रासाठी बरेच महागडे ठरत आले आहे. चौथ्या दिवसाच्या खेळात बंगालने सकाळचे पहिले व सायंकाळचे तिसरे सत्र गाजवले तर दुपारच्या मधल्या सत्रात सौराष्ट्रने तीन बळी घेत सामन्यात जान आणली.
आघाडीसाठी प्रयत्न
वास्तविक, तिसऱया दिवशीच पहिल्या डावाच्या आघाडीवर या सामन्यातील निर्णायक विजेता ठरेल, हे स्पष्ट झाले आणि आताही दोन्ही संघांचे या निर्णायक आघाडीसाठीच कसोशीने प्रयत्न सुरु आहेत. गुरुवारी 3 बाद 134 या मागील धावसंख्येवरुन पुढे खेळाला सुरुवात झाल्यानंतर सुदीप चटर्जी (241 चेंडूत 81) व वृद्धिमान साहा (184 चेंडूत 64) यांनी 101 धावांची भागीदारी साकारली. या जोडीने 49 षटके खेळपट्टीवर ठाण मांडत सौराष्ट्राच्या गोलंदाजांना पहिल्या सत्रात अगदी एकही यश मिळू दिले नाही. बंगालने या पहिल्या सत्रात 29 षटकात 89 धावा फलकावर लावल्या.
चौथ्या दिवसाच्या येथील खेळात काही चेंडू अचानक खाली रहात होते आणि अर्थातच याचा लाभ घेण्यासाठी सौराष्ट्राच्या गोलंदाजांचा भर यष्टीच्या दिशेने अधिक होता. या पार्श्वभूमीवर, चटर्जीने अधिक संयमी, बचावात्मक, सावध खेळावर भर दिला. साहाने मात्र आश्चर्यकारकरित्या धोकादायक फटक्यांना सातत्याने पसंती दिली.
साहाची अनाठायी साहसी खेळी
कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक-फलंदाज असलेल्या साहाकडून धोकादायक फटके खेळण्याच्या प्रयत्नात अनेक चुका झाल्या. दोनवेळा तर तो जयदेव उनादकटच्या गोलंदाजीवर पायचीत होता होता बचावला. या दोन्ही वेळा डीआरएसमधून त्याची सुटका झाली. नंतर आत्मघाती एकेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात त्याने जवळपास आपली विकेट फेकलीच होती. इतके कमी की काय म्हणून 46 धावांवर असताना त्याला गलीत तैनात क्षेत्ररक्षकाने जीवदान दिले. शिवाय, तो चौकार जात साहाचे अर्धशतक फलकावर लागले.
सौराष्ट्रने दिवसभरात दोनवेळा डीआरएस घेतला, दोन्ही वेळा उनादकट गोलंदाजीवर तर साहा स्ट्राईकवर होता आणि या दोन्ही वेळी तिसऱया पंचांनी अपील फेटाळून लावले. प्रारंभी, दिवसातील तिसऱयाच षटकात साहाला मैदानी पंचांनी बाद दिले. पण, रेफरल घेतला गेल्यानंतर तिसरे पंच एस. रवी यांनी साहाला नाबाद ठरवले. रिप्लेत चेंडू बॅटला चकवा देत पॅडवर आदळल्याचे दिसून आले. त्यानंतर सत्रातील शेवटच्या टप्प्यात चेंडू यष्टीच्या दिशेने पॅडवर आदळला. पण, यावेळी मैदानी पंचांनी साहाला नाबाद ठरवले. सौराष्ट्राने येथे डीआरएस घेतला. पण, येथे चेंडूचा निम्माच भाग इम्पॅक्ट लाईनवर येत असल्याने तिसऱया पंचांनी मैदानी पंचांचा निर्णय कायम ठेवला. यामुळे उनादकटची अधिक निराशा झाली.
उनादकटच्या नाराजीत भर
वास्तविक, चेंडू ज्या रोखाने पॅडवर आदळला, ते पाहता पंच सहजपणे साहाला बाद ठरवतील, असे गृहित धरत उनादकटने आनंदाला सुरुवात केलीच होती. पण, पंचांनी यानंतरही त्याला नाबाद ठरवल्याने उनादकट नाराज झाला. उपाहारानंतर आठव्या षटकात चटर्जीने जडेजाच्या गोलंदाजीवर शॉर्ट लेगकडे झेल दिला आणि ही जोडी अखेर फुटली. नंतर साहाची खेळी मध्यमगती गोलंदाज प्रेरक मंकडने त्याला त्रिफळाचीत करत संपुष्टात आणली. दुपारच्या सत्रातील काही खेळ बाकी असताना डावखुरा गोलंदाज चेतन साकरियाने शाहबाज अहमदला त्रिफळाचीत केले आणि बंगालची यावेळी 6 बाद 263 अशी स्थिती झाली. हे एकच सत्र सौराष्ट्रासाठी अनुकूल ठरले. या सत्रात त्यांनी 28 षटकात केवळ 46 धावा दिल्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 3 बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
सौराष्ट्र पहिला डाव : सर्वबाद 425. बंगाल पहिला डाव : 6/354. (सुदीप चटर्जी 81, वृद्धिमान साहा 64, अनुस्तुप मजूमदार खेळत आहे 58, अर्णब नंदी खेळत आहे 28. प्रेरक मंकड 2/45).
शेवटच्या दिवशी एकाही चाहत्याला प्रवेश नाही
बंगाल-सौराष्ट्र यांच्यातील रणजी अंतिम लढत निर्णायक, रंगतदार टप्प्यावर आली असताना कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज पाचव्या व शेवटच्या दिवशी एकाही चाहत्याला स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी प्रवेश दिला जाणार नाही, असे बीसीसीआयने स्पष्ट केले.
शेवटच्या दिवसातील खेळासाठी फक्त खेळाडू, पदाधिकारी व माध्यम प्रतिनिधींनाच परवानगी दिली जाईल, असे बीसीसीआयचे प्रथमश्रेणी क्रिकेट व्यवस्थापक साबा करीम यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना नमूद केले. अर्थात, या निर्णयामुळे किती फरक पडणार, हा देखील विचार करायला लावणारा प्रश्न आहे. कारण, मुळातच पहिल्या चार दिवसांच्या खेळात अतिशय कमी संख्येने इथे चाहते हजर राहिले होते. बंगालचा संघ येथे 1989-90 नंतर पहिल्या जेतेपदासाठी तर सौराष्ट्र स्पर्धेच्या इतिहासातील पहिल्यावहिल्या जेतेपदासाठी प्रयत्नात आहे.