संमेलनाध्यक्ष रणजित चौगुले यांचे प्रतिपादन : कुद्रेमनी येथे बलभीम साहित्य संघ-ग्रामस्थांतर्फे 16 वे मराठी साहित्य संमेलन उत्साहात
वार्ताहर / कुद्रेमनी
साहित्य हा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा प्रवाह आहे. स्थळ-काळानुसार तो बदलतो. साहित्याच्या केंद्रस्थानी मनुष्य आहे. साहित्याचे वाचन माणसाच्या जीवनात संस्कार करते. त्यामुळे साहित्य संमेलने आवश्यक आहेत, असे मत शिक्षक रणजित चौगुले यांनी व्यक्त केले.
कुद्रेमनी येथील बलभीम साहित्य संघ व ग्रामस्थांच्यावतीने 16 वे मराठी साहित्य संमेलन रविवारी पार पडले. यावेळी अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर संघाचे पदाधिकारी व विविध मान्यवर उपस्थित होते. रणजित चौगुले म्हणाले, साहित्याची बिजे काळजात साठलेली असतात व योग्यवेळी ती कागदावर उमटतात. स्वातंत्र्यपूर्व काळात लेखकाची भूमिका ‘लेखण्या सोडा बंदुका हातात घ्या’, अशी होती. आज मात्र बंदुका मोडा व लेखणी हातात घेऊन शांती निर्माण करा, असे सांगण्याची गरज निर्माण झालेली आहे.
प्रारंभी ग्रंथदिंडी काढण्यात आली. आर. एम. चौगुले यांच्या हस्ते पॉलिहैड्रॉन व्यासपीठाचे उद्घाटन करण्यात आले. हभप मल्लाप्पा पाटील यांनी ग्रंथदिंडीचे उद्घाटन केले. जोतिबा पाटील यांनी ग्रंथपूजन, निंगाप्पा पाटील यांनी पालखीपूजन, जोतिबा बडसकर यांनी अश्वारुढ शिवपुतळा पूजन, डॉ. एल. एम. हुलजी यांनी कै. परशराम गुरव स्मारक पूजन, ग्रा. पं. अध्यक्षा रेणुका नाईक यांनी सरस्वती प्रतिमापूजन, शांताराम पाटील यांनी ज्ञानेश्वर प्रतिमापूजन, आरती लोहार यांनी सावित्रीबाई फुले प्रतिमापूजन, शिवाजी मुरकुटे यांनी म. जोतिबा फुले प्रतिमापूजन, शिवाजी गुरव यांनी शिवप्रतिमा पूजन, शट्टुप्पा काकतकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमापूजन, डॉ. एन. एम. गुरव यांनी राजषी शाहू महाराज प्रतिमापूजन, डॉ. विजय के. कट्टीमनी यांनी संत तुकाराम महाराज प्रतिमापूजन केले. प्रवेशद्वाराचे उद्घाटन मिनाजी गुरव यांच्या हस्ते करण्यात आले.
संमेलनाचे उद्घाटन जि. पं. च्या माजी सदस्या सरस्वती पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पी. एल. गुरव यांनी प्रास्ताविक केले. गावाला साहित्य व कलागुणांची जुनी परंपरा आहे. नव्याने वाङ्मय निर्मिती व्हावी, या हेतूने संमेलन घेण्यात येते. नागेश राजगोळकर यांनी स्वागत केले.
मातृभाषा वाचविण्यासाठी गावोगावी संमेलने भरविली पाहिजेत-सरस्वती पाटील
सरस्वती पाटील म्हणाल्या, बलभीम संघाचा साहित्य संमेलन भरविण्याचा उपक्रम हा सर्वांना पुढे घेऊन जाणारा आहे. मराठी भाषेत ज्ञानेश्वरी दडलेली आहे. जी भाषा आम्हाला कळते, ती आम्हाला हवी आहे. यासाठीच आम्ही न्याय मागतो. मातृभाषा वाचविण्यासाठी गावोगावी संमेलने भरविली पाहिजेत.
याच संमेलनात ऍड. महेश बिर्जे, ऍड. सुधीर चव्हाण, आर. एम. हुलजी, माणिक गोवेकर, कांचन जाधव, एल. बी. देसाई, राजेंद्र पाटील, शिवाजी शिंदे, डॉ. शुभम नाईक, पै. वैष्णव शट्टुप्पा काकतकर, पै. शुभम जोतिबा बडसकर, पै. संकेत शिवाजी पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
वाचनातून माणसे घडतात : मायाप्पा पाटील
वाचनातून माणसे घडतात. साहित्य संमेलने वाचनातून प्रेरणा देतात. संमेलने म्हणजे एक दिवसाचा जागर नसतो तर आयुष्य घडविण्याचा केंद्रबिंदू असतो. पुस्तकांच्या सहवासामुळेच महात्मे घडले. दागिन्यांपेक्षा वाचनालयातील पुस्तके ही अधिक मौल्यवान आहेत, असे मत प्रा. मायाप्पा पाटील यांनी व्यक्त केले.
‘वाचाल तर वाचाल’ यावर बोलताना ते म्हणाले, पुस्तक वाचनाने एखादी व्यक्ती अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष होऊ शकते. तुकोबांची गाथा, भगवतगीता, मृत्युंजय, श्यामची आई, फकिरा अशी अनेक पुस्तके आयुष्य बदलतात. शिवराय केवळ व्याख्यानांचा विषय नाही तर जगण्याच्या प्रेरणेचा विषय आहे. ग्रामीण भागात वाचनालयांचे दरवाजे खुलेच असायला हवेत. पालकांनी आपल्या मुलांना वाचनाची सवय लावायला हवी. भारत घडविण्याची ताकद मुलांमध्ये निर्माण होण्यासाठी बालसाहित्य संमेलने होणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
सूत्रसंचालन डॉ. मधुरा गुरव, नागेश राजगोळकर व शिवाजी शिंदे यांनी केले. राजू राजगोळकर यांनी आभार मानले.
या संमेलनासाठी समस्त युवक संघटना, सावित्रीबाई फुले महिला मंडळ, प्राथमिक, माध्यमिक शाळा, भजनी मंडळे, स्व-साहाय्य संघ, पतसंस्था, दूधसंस्था, ग्राम पंचायत व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.