प्रतिनिधी / जयसिंगपूर
स्पर्धा परीक्षा व इतर परीक्षांच्या तयारीसाठी महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यांमधून पुण्यामध्ये वास्तव्यास असलेल्या जवळपास २३०० विद्यार्थ्यांच्या वर आपापल्या गावी जायचं कसं? पुण्यामधील सर्व हॉटेल्स व खाजगी मेस लाॅकडाऊन मुळे बंद असल्याने पोटाला खायचं काय? असा प्रश्न उभा राहिला होता, या विद्यार्थ्यांनी अनेकांशी संपर्क साधून मदतीचे आवाहन केले, पुण्यामधील काही सेवाभावी संस्थांनी काही काळ मदत केली सुद्धा, पण लॉकडाऊन वाढू लागले आणि मग या मुलांना गावी जाण्याची ओढ लागली, या सर्व विद्यार्थ्यांचे पालक हे सुद्धा चिंतेत होते, काही मुलांनी पुढाकार घेऊन टेलिग्राम वर हजारावर मुलांचा एम. पी. एस. सी. स्टुडंटस् राइट्स हा ग्रुप तयार केला आणि याद्वारे हॅश टॅग चालवत अनेकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, आणि ट्विटरवर आपली व्यथा मांडली.
राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी या विद्यार्थ्यांचे ट्विट पाहिल्यानंतर त्यांना स्वतः ट्विट करत त्यांच्याकडून त्यांच्या समोर असलेल्या अडचणी ची माहिती घेतली विद्यार्थ्यांच्या अडचणी ध्यानात आल्यावर आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी ट्विटरवरून या मुलांशी संपर्क साधला आणि त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले, मंत्री यड्रावकर यांनी तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून या विद्यार्थी-विद्यार्थिनींना मदत करण्याबाबतची विनंती केली त्याचबरोबर पुणे जिल्हाअधिकारी तसेच आपत्ती व्यवस्थापन प्रमुख यांच्याशी संपर्क साधून पुणे शहर व परिसरात अडकून पडलेल्या या विद्यार्थी-विद्यार्थिनींना गावी जाण्यासाठी सहकार्य करा असे सांगितले, मंत्रालय स्तरावर राज्यमंत्री यड्रावकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे तातडीने हालचाली होत पुणे जिल्हा अधिकारी यांनी या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना वैद्यकीय तपासणी करून घेऊन आपापल्या गावी जाण्याची परवानगी दिली, विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने शासकीय रुग्णालयांमध्ये असलेले वैद्यकीय तपासणीसाठी वेळ लागत होता. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी पुन्हा राज्यमंत्री नामदार यड्रावकर यांच्याशी संपर्क साधला आणि वैद्यकीय प्रमाणपत्र मिळण्यासाठी अडचणी येत असल्याचे सांगितले, मंत्री यड्रावकर यांनी पुण्यामधील शासकीय रुग्णालयांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प सुरू करावेत व त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र तातडीने उपलब्ध करून द्यावे असे आदेश दिले.
त्यामुळे विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र वेळेवर मिळू लागली आहेत, आणि विद्यार्थ्यांना गावी जाण्याचा मार्ग मोकळा झाला, यामधील शेकडो विद्यार्थी आपल्या गावी घरी पोहोचले आहेत, आणि गावी सुखरूप पोहचलेल्या या विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया वरून व्हिडिओ ऑडिओ क्लिपद्वारे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत आहेत, पुण्यातील या विद्यार्थ्यांच्या सोबत मंत्री यड्रावकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधला होता, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या होत्या त्यांना मदत करण्याचा शब्द दिला होता, त्यांनी केलेल्या या मदतीमुळेच या सर्व विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालक वर्गामध्ये सुद्धा समाधान व्यक्त केले जात आहे.