प्रतिनिधी/ बेळगाव
शहर परिसरातील मुख्य रस्त्यांसह बसस्थानक व इतर ठिकाणी कचरा साचून राहिला आहे. या कचऱयाची वेळेत उचल होत नसल्यामुळे कचऱयाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहर स्वच्छ राखण्यास मनपा प्रशासन अपयशी ठरताना दिसत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कचरा समस्या मनपासाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे.
येथील जुन्या पी. बी. रोडवरील नवीन काँक्रीटच्या रस्त्यावरच कचऱयाची समस्या निर्माण झाल्याने परिसरातील व्यापारी व नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. रस्ता चकचकीत झाला मात्र रस्त्यावरील कचऱयाची समस्या जैसे थेच असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत. कचरा रस्त्यावर पडून असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे पादचाऱयांना नाक मुठीत धरूनच ये-जा करावी लागत आहे. शहरातील कचरा समस्या सोडविण्यासाठी मनपा प्रशासनातर्फे वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर व गर्दीच्या ठिकाणी कचरापुंडय़ा ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, याकडे दुर्लक्ष करून कचरा रस्त्यातच फेकताना दिसत आहेत. त्यामुळे कचऱयाचा प्रश्न गंभीर बनत आहे.
शहर परिसरात स्वच्छतेसाठी मनपाच्या ताफ्यात वाहनांसह स्वच्छता कर्मचारी आहेत. मात्र दिवसेंदिवस वाढत चाललेला शहराचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या यामुळे कचरा समस्येत सतत वाढ होत आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱयाचे ढीग दिसून येत आहेत. जुन्या पी. बी. रोडवर काँक्रिटीकरणाचा रस्ता झाला आहे. मात्र या नवीन स्मार्ट रस्त्यावर कचऱयाची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे स्मार्ट रस्त्यावरील कचऱयाची उचल कधी, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. त्यामुळे मनपा स्वच्छता विभागाने तातडीने कचऱयाची उचल करून स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.