विद्रुपीकरणाला जबाबदार कोण?
बेळगाव : लाखो रुपये खर्च करून बेळगावमध्ये स्मार्ट रेल्वेस्थानकाचे बांधकाम करण्यात आले. परंतु रेल्वेस्थानकाच्या लोकार्पणापूर्वीच रेल्वेस्थानकासमोर काहींनी आपला संसार थाटला. रेल्वेस्थानकाच्या समोर सुरू असणाऱ्या या विद्रुपीकरणामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त होत असून रेल्वे प्रशासन तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डने असे प्रकार घडणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशी मागणी होत आहे. रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात असल्याने रंगरंगोटीचे काम सुरू आहे. प्रवेशद्वारासह संरक्षक भिंतीला उत्तम असा रंग देण्यात आला आहे. परंतु मंगळवारी रात्री काही भटक्या प्रवाशांनी रेल्वेस्टेशनसमोरील संरक्षण भिंतीलगत संसार थाटला आहे. मुख्य प्रवेशद्वारानजीक कपडे सुकत घालण्यात आल्याने एक विचित्र स्वरुप या ठिकाणी दिसत आहे. या प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत होती. यासाठीच लाखो रुपये खर्च करून रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण केले का? असा प्रश्न उपस्थित होत होता. दररोज शेकडो प्रवासी रेल्वेस्थानकावरून प्रवास करतात. त्याचबरोबर ग्रामीण भागात जाणारी बससेवाही समोरील बसस्थानकातून चालविली जाते. असे असताना रेल्वेस्थानकासमोर संसार थाटण्यास परवानगी कोणी दिली? असा प्रश्न उपस्थित होतो. नुकत्याच रंगकाम केलेल्या भिंतींचे विद्रुपीकरण होत असतानाही रेल्वे प्रशासन गप्प का? असाही प्रश्न निर्माण होत आहे.
बाग की सार्वजनिक शौचालय?
रेल्वेस्टेशनसमोर सैनिक विश्रामगृहाच्या बाजूला कॅन्टोन्मेंट बोर्डची बाग आहे. परंतु मागील काही वर्षांपासून या बागेकडे कॅन्टोन्मेंट बोर्डने दुर्लक्ष केल्यामुळे त्याचे आता सार्वजनिक शौचालय तयार झाले आहे. रेल्वेतून आलेले भटके प्रवासी या ठिकाणी अनेक महिने तळ ठोकून असतात. याच ठिकाणी आंघोळ करणे, शौचाला जाणे असे प्रकार करत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असा किळसवाणा प्रकार सुरू असतानाही कँन्टोन्मेंट प्रशासन मात्र ढिम्म आहे.