मनपाकडून कारणे दाखवा नोटीस मुख्य सचिवांनी केली केली पाहणी
प्रतिनिधी/ पणजी
राजधानीत चाललेल्या स्मार्ट सिटीच्या कामांच्या पार्श्वभूमीवर शहरातील नाले, गटारे यांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याबद्दल मनपाने संबंधित परिसरांच्या सुमारे 30 पर्यवेक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
राज्याचे मुख्य सचिव, महापालिका अभियंता तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यांनी दि. 10 मार्च रोजी शहरातील विविध ठिकाणी पाहणी केली असता अनेक नाले आणि गटारांमध्ये प्लास्टिक व काचेच्या बाटल्या साचलेल्या आढळून आल्या. त्याशिवाय रस्त्यांवरील पालापाचोळा स्वच्छ न केल्यामुळे पानांचे ढीग साचलेले दिसून आले. या प्रकारांसाठी संबंधित परिसराचे पर्यवेक्षक, वरिष्ठ पर्यवेक्षक व पर्यवेक्षक यांना जबाबदार धरून सदर नोटीस बजावण्यात आली आहे.
रस्ता स्वच्छता, नाल्यांची दुऊस्ती व स्वच्छता, झाडांची छाटणी, गवत काढणे आदी कामे संबंधित क्षेत्र साइट पर्यवेक्षक, वरिष्ठ पर्यवेक्षक आणि पर्यवेक्षकांकडून त्यांची आळशी वृत्ती किंवा कामात रस नसल्यामुळे नियमित आणि प्रभावीपणे होत नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. परिणामी शहरात गलिच्छता पातळली असल्याचे नोटीसीत म्हटले आहे.
अशाप्रकारच्या गैरवर्तणुकीबद्दल संबंधित सर्व पर्यवेक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई का केली जाऊ नये? किंवा सेवेतून निलंबित/बडतर्फ का केले जाऊ नये? असे सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. या प्रश्नांची उत्तरे सदर नोटीस मिळाल्याच्या 48 तासांच्या आत द्यावी, असे निर्देश मनपा आयुक्त क्लेन मदेरा यांनी दिले आहेत.
हा तर ’चोर सोडून संन्याशाला फाशी’ देण्याचा प्रकार : मडकईकर
दरम्यान, अशाप्रकारे मनपाकडून पर्यवेक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या कृत्याला नगरसेवक तथा माजी महापौर उदय मडकईकर यांनी तीव्र हरकत घेतली आहे. पणजी शहराची वाट लागली आहे त्या स्मार्ट सिटीचे अधिकारी आणि कंत्राटदार जबाबदार आहेत. त्यामुळे पर्यवेक्षकांना नोटीस बजावण्यापूर्वी आयुक्तांनी स्मार्ट सिटीचे अधिकारी आणि कंत्राटदार यांना नोटीस बजावणे आवश्यक होते, असे मडकईकर यांनी म्हटले आहे. राजधानीत सध्या जो घोळ आणि सावळागोंधळ सुरू आहे त्याला स्मार्ट सिटीचे अधिकारी आणि कंत्राटदार जबाबदार आहेत. त्यासाठी मनपा पर्यवेक्षकांना दोष देणे योग्य नाही, असे मडकईकर यांनी पुढे म्हटले आहे.