पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन – शहरी स्वच्छतेचे उद्दिष्ट
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नवी दिल्ली येथे स्वच्छ भारत मिशन-शहरी 2.0 आणि शहरांचे पुनरुज्जीवन आणि परिवर्तनासाठी अटल मिशन 2.0 चा प्रारंभ केला. शहरांना पूर्णपणे कचरामुक्त करणे हे या योजनांचे उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधान मोदी उद्घाटनप्रसंगी म्हणाले. तसेच सांडपाणी आणि मैला व्यवस्थापन सुधारणे, जल सुरक्षित शहरांची निर्मिती करणे आणि सांडपाण्यापासून नद्यांना सुरक्षित ठेवणे अशी उद्दिष्टे ‘मिशन अमृत’च्या पुढील टप्प्यात अपेक्षित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधानांनी शहर पुनर्निर्माण आणि स्वच्छतेतील परिवर्तनाचे यश महात्मा गांधींना समर्पित केले. ही सर्व मिशन महात्मा गांधींच्या प्रेरणेचा परिणाम आहेत आणि केवळ त्यांच्या आदर्श मूल्यांद्वारे साकार होत आहेत. शौचालयांच्या बांधकामामुळे माता आणि मुलींना दिलासा मिळाल्याचे त्यांनी अधोरेखित केले. याप्रसंगी केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी, गजेंद्र सिंह शेखावत, प्रल्हाद सिंह पटेल, कौशल किशोर, श्री विश्वेश्वर टुडू, राज्यांचे मंत्री, महापौर आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे अध्यक्ष आणि महापालिका आयुक्त यावेळी उपस्थित होते.
स्वच्छ भारत अभियान आणि अमृत मिशनचा आतापर्यंतचा प्रवास प्रत्येक देशवासियासाठी अभिमानास्पद आहे. आजचा कार्यक्रम आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात होत असल्याकडे लक्ष वेधत स्वच्छ भारत मिशन आणि मिशन अमृतचा पुढील टप्पा बाबासाहेबांची स्वप्ने पूर्ण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे, असे पंतप्रधान म्हणाले. सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास बरोबरच सबका प्रयास, स्वच्छता मोहिमेसाठी महत्त्वपूर्ण आहे, असेही ते म्हणाले. आज भारत दररोज सुमारे एक लाख टन कचऱयावर प्रक्रिया करत आहे. देशातील शहरांच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही सातत्याने वाढत असल्याचे सांगत उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश सारख्या मोठय़ा राज्यांनी योजना लागू करण्यात पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.