महाराष्ट्रात सध्या स्वबळाचे नारे आणि जोडय़ांची भाषा सुरु आहे. याच जोडीला शिवसेना, भाजप युती होणार व मोदींनी ठाकरेंना नवा प्रस्ताव दिला असे म्हटले जाते आहे. राजकारणाच्या सारीपाटावर ही धडपड सुरु असताना उद्या 21 जूनला सर्वांत मोठा दिवस, जोडीला आंतरराष्ट्रीय योगदिन आणि लसीकरणाचा धुमधडाका असा त्रिवेणी संगम होतो आहे. पाऊस दमदार बरसतो आहे. पेरण्या झाल्या आहेत आणि आता धरणे भरु लागली आहेत. जनसामान्य या साऱया घडामोडीत तिसरी लाट येणार का आणि यंदा महापूर येईल का या आणि अशाच चिंतेत आहे. शरद पवार देशपातळीवर भाजपाला रोखण्यासाठी भाजपा विरोधकांची मोट बांधू पहात आहेत. त्यांना कन्या सुप्रिया यांना पुरोगामी महाराष्ट्राची पहिली मुख्यमंत्री करायचे आहे. त्यासाठी ते चाली करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी विधानसभेसाठी ‘मिशन 100’ आरंभले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महाआघाडी म्हणून लढायचे व किमान 40 जागा मिळवायच्या. मुंबई महापालिकेतही राष्ट्रवादीचा शिरकाव करायचा अशी त्यांची व राष्ट्रवादी काँग्रेसची इच्छा आहे. राष्ट्रवादीत अजितदादा पवार, जयंत पाटील यांनाही मुख्यमंत्री व्हायचे आहे. याच जोडीला काँग्रेसला युवराजांना म्हणजे राहुल गांधींना प्रधानमंत्री करायचे आहे. महाराष्ट्रात तडजोड व भाजपाला रोखायचे म्हणून काँग्रेसने नरमाईचे धोरण अवलंबले असले तरी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी स्वबळाची घोषणा केली आहे. काँग्रेसची पाठीत खंजीर खुपसलेली जखम भरलेली नाही. त्यामुळे पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाचा कितीही बागुलबुवा दाखवत असले तरी काँग्रेस युपीएचे नेतृत्व पवारांकडे देणार नाही आणि शिवसेनेची भाषा आणि राजकारण सहन करत त्यांना युपीएमध्ये घेणार नाही, असे स्पष्ट संकेत आहेत. मुंबई महापालिका हा शिवसेनेचा श्वास आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने तो आवळला होता. पण सेना थोडक्यात बचावली. आता मुंबई महापालिकेत जोराचा संग्राम होणार हे वेगळे सांगायला नको. राडेबाजी आणि इशारे-प्रतिइशारे सुरु झाले आहेत. मुंबई महापालिकेसह लोकसभा व आगामी विधानसभा महाआघाडी म्हणून एकत्रित लढवावी अशी भाषा सुरु असली तरी कात्रजचा घाट कसा करायचा यात आघाडीचे नेते वाकबगार आहेत. त्यातच प्रकाश आंबेडकर व श्रीमंत संभाजीराजे आरक्षणावरुन नवा पक्ष, नवी शक्ती उभी करु लागले आहेत. राज ठाकरे गप्प आहेत आणि मुंबईत परप्रांतीय कमी नाहीत. अनेकांच्या अनेक अपेक्षा व भूमिका आहेत. या पार्श्वभूमीवर जो तो राजकारण रेटतो आहे. मुंबईत शनिवारी शिवसेनेचा स्थापना दिन साजरा झाला. स्थापनादिनाच्या पार्श्वभूमीवर सेना भवनासमोर झालेला भाजपा-सेना राडा त्यानंतर मातोश्रीवर झालेले सत्कार आणि वर्धापनदिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेली जोडय़ाची भाषा राजकारणाचा स्तर व आगामी दिशा स्पष्ट करायला पुरेशी आहे. शिवसेना दोन्ही डगरीवरुन हात ठेवून वाटचाल करताना दिसत आहे. भाजपाला पहाटेच्या शपथविधीचा मनस्ताप झालेला दिसतो. पण ‘डिफरन्स पार्टी’ असे कितीही ढोल वाजवले तरी भाजपा फार सोवळी व वेगळी नाही हे वारंवार दिसून आले आहे. बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या विजयानंतर भाजपात आत्मचिंतन आणि काही बदल यासाठी हालचाली सुरु आहेत. राममंदिरासाठी जमीन खरेदीत घोटाळा प्रकरण भाजपाला उत्तर प्रदेशमध्ये महागात पडू शकते. दिल्लीची सत्ता उत्तर प्रदेशातून हाती येते हे सर्वच पक्षांना माहिती आहे. ओघानेच भाजपा आता उत्तर प्रदेश व निवडणुका असलेली गोव्यासह अन्य राज्ये येथे काही निर्णय करण्याची शक्यता आहे. भाजपाला महाराष्ट्रातही लोकसभा व विधानसभा चांगल्या जागा हव्या आहेत. भाजपाने पंढरपूर पोट निवडणूक महाआघाडीला तोंडावर पाडून जिंकली असली तरी सार्वत्रिक निवडणुका सोप्या नाहीत. या पार्श्वभूमीवर काही मोठे व धोरणात्मक बदल झाले तर ते आश्चर्य नाही. उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री म्हणून राजनाथसिंग यांना पाठवले जाऊ शकते. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत केंद्रीय मंत्री केले जाऊ शकते. भाजपाने नारायण राणेंना केंद्रीय मंत्री करणार अशी चर्चा सुरु केली आहे. त्यामागेही राजकारण आहे. त्याच जोडीला ठाकरे-मोदी 30 मिनिटे गुप्त चर्चा व 50 मिनिटांचे फोन संभाषण यावरुन तर्क केले जात आहेत. भाजपाने मोदीमार्फत शिवसेनेचा मुख्यमंत्री भाजपाचे दोन उपमुख्यमंत्री, लोकसभेला 40 व 18 असे जागा वाटप आणि मुंबई महापालिका व विधानसभेला प्रत्येकी 144 जागा, ज्याचे जास्त सदस्य तो महापौर, ज्याचे जास्त आमदार तो मुख्यमंत्री असा प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे. शिवसेनापक्ष प्रमुखांनी अजून या प्रस्तावावर होकार दिलेला नाही. पण आम्ही म्हटले तसे काही तरी शिजते आहे. पण हे सारे मतदारांना आणि कार्यकर्त्यांना गृहीत धरत आहेत. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाजपाला रोखण्यासाठी व विजय मिळवण्यासाठी लोकसभेच्या 400 जागा सुचवल्या आहेत. काँग्रेसला तिसरा पक्ष असे हिणवणे आणि जोडय़ाची भाषा महाआघाडीला अडचणीची ठरु शकते. काँग्रेसचे पटोले व जगताप स्वबळाचे बोलत असले तरी तो हायकमांडचा आवाज आहे हे विसरुन चालणार नाही. या साऱया पार्श्वभूमीवर कोणत्याही राजकीय पक्षाला वाढण्याचा विस्तारण्याचा हक्क आहे व तो कोणाला हिरावून घेता येणार नाही. ओघानेच नाना पटोले यांची स्वबळाची भाषा चुकीची नाही. राजकीय पक्षाचा स्वबळाचा नारा असला तरी कुणालाही एकहाती सत्तेचे बळ नाही हे लक्षात घेतले पाहिजे आणि सत्तेबरोबर महाराष्ट्रहित-राष्ट्रहित जोपासले पाहिजे.
Previous Articleभारताच्या आयटी नियमांवर आता ‘युएन’चा आक्षेप
Next Article जिल्हा आजपासून होणार अनलॉक
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.