नॅशनल काँग्रेसमार्फत गोवा मुक्तीसाठी दिले भरीव योगदान, बंधू स्व. डॉ. पुंडलिक गायतोंडेंकडून प्रेरणा
प्रतिनिधी / काणकोण
ऐन तारुण्यात गोवा मुक्तीलढय़ात भूमिगत कार्यकर्ते म्हणून उतरलेले पाळोळे, काणकोण येथील स्वातंत्र्यसेनानी शिवानंद उर्फ नंदा दत्तात्रय गायतोंडे यांचे 6 रोजी वयाच्या 95 व्या वर्षी पुणे येथील जोशी इस्पितळात निधन झाले. नॅशनल काँगेस-गोवाच्या गोव्याव्यापी सत्याग्रह मोहिमेच्या संदर्भात काणकोण, सासष्टी आणि मुरगाव या तीन तालुक्यांची जबाबदारी स्व. गायतोंडे यांच्याकडे होती. त्यांचे ज्येष्ठ बंधू डॉ. पुंडलिक गायतोंडे यांच्याकडून त्यांना मुक्तीसाठी लढण्याची प्रेरणा मिळाली.
नॅशनल काँग्रेस-गोवाचे काम गोवाभर चालू असताना 19 जून, 1954 रोजी शिवानंद गायतोंडे यांना पोर्तुगीज सरकारने पकडून त्यांची रवानगी मडगावच्या कारागृहात केली. याच काळात सबळ पुरावा असलेल्या ज्या 27 जणांवर सरकारने सैनिकी न्यायालयात खटले दाखल केले त्यात गायतोंडे यांचाही समावेश होता. या खटल्याचा निकाल 5 जुलै, 1955 रोजी लागला आणि गायतोंडे यांना आठ वर्षांची सक्तमजुरी व दिवसाला 20 इश्कुंद याप्रमाणे दोन वर्षांचा दंड तसेच 15 वर्षे राजकीय हक्क निलंबित अशी शिक्षा फर्मावण्यात आली. मात्र सार्वत्रिक माफीमुळे सप्टेंबर, 1959 पूर्वीच त्यांची सुटका करण्यात आली. शिक्षकी पिंडाच्या गायतोंडे यांनी आग्वादच्या तुरुंगात असताना अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान यांचा अभ्यास केला आणि तुरुंगातील कैद्यांनाही त्याचा लाभ मिळवून दिला.
गोवा मुक्तीनंतर पुढील शिक्षणासाठी ते इंग्लडलाही जाऊन आले. नॅशनल काँग्रेस, गोवाच्या संघटनात्मक वाढीत त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले. पुण्यात टेक्निकल कन्सल्टंट म्हणून ते काम पाहत होते. आपले बंधू स्व. डॉ. पुंडलिक गायतेंडे यांच्या स्मरणार्थ पाळोळे येथील आपल्या निवासस्थानी बरीच वर्षे त्यांनी 17 फेब्रुवारी हा दिवस गायतोंडे दिन म्हणून पाळला. त्याअंतर्गत काणकोणच्या विविध शाळा तसेच उच्च माध्यमिक विद्यालयांतील विद्यार्थी आणि काणकोण तालुक्यातील शिक्षण तसेच अन्य क्षेत्रांतील जाणकारांना बोलावून या दिनाचे महत्त्व पटवून देण्याचे काम त्यांनी केले.
स्व. शिवानंद गायतोंडे यांचे संपूर्ण घराणेच देशप्रेमी आणि सत्याग्रही वृत्तीचे होते. त्यांच्या निधनाने गोवा मुक्तीलढय़ाचा एक साक्षीदार काणकोणवासियांनी गमावला असल्याची प्रतिक्रिया कमलाकर म्हाळशी, नारायण देसाई, संदेश प्रभुदेसाई, रमेश कोमरपंत, डॉ. पुष्पा अय्या आणि अन्य व्यक्तींनी व्यक्त केली आहे.