राज्यपाल, मुख्यमंत्र्यांच्या जनतेला शुभेच्छा
प्रतिनिधी / पणजी
गोवा क्रांती दिनानिमित्त पणजीत आयोजित मुख्य कार्यक्रमावर कोविड 19 च्या धास्तीचा परिणाम झाला असून आजच्या या सोहळय़ास स्वातंत्र्यसैनिक उपस्थित रहाणार नाहीत. सरकारने मोठा मंडप रद्द केला असून केवळ राज्यपाल व मुख्यमंत्री आझाद मैदानावरील स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहतील.
राज्यात कोविड 19 चा वाढता प्रभाव लक्षात घेऊन गोवा स्वातंत्र्यसैनिक संघटनेने 18 जून क्रांतीदिन सोहळा रद्द करावा, अशी मागणी राज्य सरकारकडे केली होती. तथापि सरकारने वार्षिक पद्धतीनुसार कार्यक्रम आयोजित केला होता. केवळ शाळकरी मुलांना टाळण्यात आले तसेच कोणालाही निमंत्रण पत्रिका पाठविली नाही. एवढे असून देखील मोठा मंडप घालण्याची तयारी चालू होती. स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे कोषाध्यक्ष सरदेसाई यांनी ही बाब सचिव गुरुदास कुंदे यांच्या लक्षात आणली. कुंदे यांनी सरकारला पुन्हा विनंती केली. त्यानंतर आझाद मैदानावरील मुख्य मंडप रद्द करण्यात आला. त्यात बदल करून केवळ मुख्यमंत्री व राज्यपालांना कार्यक्रमाला उपस्थित रहाणे शक्य व्हावे या उद्देशाने मंडपाची रचना केली.
आज सकाळी 8.45 वा. राज्यपाल सत्यपाल मलिक व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आझाद मैदानावर जाऊन स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करतील आणि आदरांजली वाहतील. पोलिसांचे बँड पथक धून वाजवितील व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता होईल. आझाद मैदानावर यावेळी प्रवेशावर मर्यादा असतील. काळजी घेण्यासाठीच सरकारने यावर्षी थोडक्यात हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून क्रांती दिनाच्या शुभेच्छा
राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गोव्यातील लोकांना गोवा क्रांती दिनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. गोवा मुक्ती चळवळीचा काळ हे स्वातंत्र्यसैनिकांच्या महान त्यागाचे युग होते. अनेक स्वातंत्र्यसैनिक हुतात्मे, झाले तर शेकडो स्वातंत्र्यसौनिकांना त्रास सहन करावे लागले आणि हद्दपार व्हावे लागले. महत्वाचे म्हणजे गोवा मुक्ती लढय़ासाठी देशाच्या इतर भागातील लोकांनीही आपणहून स्वतः योगदान दिले. आपल्या त्यागातून गोमंतकीयांना सन्मानाने जगण्यास आणि भविष्यासाठी स्वतः नियोजन करण्याचा मार्ग शक्मय केला. त्यांच्या स्मृत्यर्थ आपण सर्वांनी आदरपूर्वक नतमस्तक झाले पाहिजे. आजचा समाज स्वातंत्र्यसैनिकांना सन्मानाने वागवितो हे खूप महत्वाचे आहे, असे राज्यपालांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून क्रांती दिनाच्या शुभेच्छा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, स्वातंत्र्य सेनानी डॉ राम मनोहर लोहिया यांनी 18 जून 1946 साली परकीय जोखडाविरूध्द लढा देण्यासाठी गोव्यातील लोकाना एकत्र येण्याची हाक दिली. तेव्हा स्वातंत्र्यलढय़ाने शेवटच्या आणि अंतिम टप्यात प्रवेश केला आणि त्याचा शेवट 19 डिसेंबर 1961 साली गोवा मुक्त होण्यात झाला. स्वातंत्र्यासाठी लढा दिलेल्या गोव्यातील लोकांच्या व स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षाचे स्मरण करण्यासाठी हा ऐतिहासिक दिवस क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. याप्रसंगी आपण स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांना अभिवादन करून त्यांना आदरांजली वाहूया आणि या कठीणप्रसंगी लोकसेवेसाठी स्वतः समर्पित होऊया असे मुख्यमंत्री आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.