योगी-मोदींना उद्देशून विधान
भाजप सोडून समाजवादी पक्षात गेलेले माजी मंत्री स्वामीप्रसाद मौर्य यांनी पंतप्रधान मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. अहमदाबाद स्फोटातील दहशतवादी अद्याप जिवंत असतील तर मोदी आणि योगींनी ‘चुल्लू भर पानी में डूब कर मर जाना चाहिए’ असे म्हटले आहे.
स्वामीप्रसाद मौर्य हे सपचे स्टार प्रचारक आहेत. त्यांनी सप उमेदवाराच्या समर्थनार्थ प्रचारसभेला संबोधित करताना हे विधान केले आहे. भाजप हा खोटारडय़ांचा पक्ष ठरला आहे. पक्षासाठी काम करणाऱयांनाच ते बाजूला टाकतात. राज्यात भरती प्रक्रियेत स्वतःच्या लोकांनाच नोकरी देण्यात आली आहे. योगी हे राज्यात आणि मोदी हे केंद्रात आहेत, तरीही दहशतवाद कायम असल्याने त्यांनी स्वतःचा जीव द्यावा असे वादग्रस्त उद्गार स्वामीप्रसाद यांनी काढले आहेत.
भाजपच्या धोरणांमुळे व्यापारीवर्ग त्रस्त आहे. मोदींना केवळ गुजरातचे व्यापारी दिसतात. भाजप सरकार लवकरच पायउतार होणार असल्याचा दावा त्यांनी केला.
योगी सरकार तरुणाई तसेच शेतकरीविरोधी आहे. तसेच आरक्षणविरोधी देखील आहे. हे सरकार घटनेलाही विरोध करणार आहे. योगी सरकारच्या पापांचा घडा भरला असल्याचे स्वामीप्रसाद म्हणाले.