ऑनलाईन टीम / पुणे :
स्वारद फाऊंडेशनच्यावतीने एक घास आपुलकीचा या उपक्रमांतर्गत पुण्यातील दररोज ५०० लोकांना गरजू नागरिकांना अन्न वाटप करण्यात आले. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत संस्थेमार्फत अन्न वाटप करण्यात येत आहे.
स्वारद फाऊंडेशनच्या संस्थापिका स्वाती मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली एक घास आपुलकीचा, वसा माणुसकीचा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. बालकीर्तनकार ह.भ.प. साईमहाराज शंकर कुडले, विलास मारणे, अर्जुन शिळीमकर, करण मोरे या कार्यकर्त्यांनी उपक्रमात सहभाग घेतला.
स्वाती मोहोळ म्हणाल्या, लॉकडाऊनमुळे अनेकांना कामासाठी बाहेर पडता येत नाही. त्यामुळे हातावर पोट असणा-या गरजूंना जेवण मिळावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पोळी भाजी, मसालेभात असे रोजचे दोन वेळचे जेवण संस्थेच्या वतीने देण्यात येते. दररोज ५०० लोकांना जेवणाचे वाटप करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
हडपसर, विश्रांतवाडी, कॅम्प, कोथरूड, शनिवारवाडा, बाजीराव रस्ता, पुणे स्टेशन आणि मुळशी मधील गावे या ठिकाणी अन्न वाटप करण्यात येत आहे. शेतमजूर, रिक्षाचालक यांनाही जेवणाचे वाटप करण्यात येते.