सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आपला सेवाकाळ पूर्ण होण्यापूर्वी ज्या कर्मचाऱयांनी स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) घेतली आहे, ते पूर्ण वेळ सेवा देऊन निवृत्त झालेल्या कर्मचाऱयांच्या समान मानता येणार नाहीत, असा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या संबंधातील याचिका दोन स्वेच्छा निवृत्त कर्मचाऱयांनी सादर केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी ती सादर करण्यात आली होती.
पूर्णवेळ काम करुन निवृत्त झालेल्या कर्मचाऱयांप्रमाणेच स्वेच्छानिवृत्त कर्मचाऱयानाही वेतनमान द्यावे अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने या समानतेची मागणी फेटाळली होती. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय उचलून धरताना याचिका फेटाळली.
फेटाळण्याचे कारण
आपल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने कारणे स्पष्ट केली आहेत. पूर्ण कलावधी काम करुन निवृत्त झालेल्या कर्मचाऱयांनी योग्य प्रकारे त्यांचे उत्तरदायित्व पार पडलेले असते. तर स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्यांनी भरपाई घेऊन मध्येच सेवा सोडलेली असते. त्यामुळे हे दोन्ही कर्मचारी समान नसतात, असे स्पष्ट करण्यात आले.