पाण्यासाठी डोंगर पालथा : गावांतील महिला, मुलं उन्हाचे चटके सोसत व रात्रभर जागुन भरत आहेत झऱ्यातलं पाणी
वार्ताहर / कास :
कडक उन्हाळय़ाची चाहुल लागली आहे. उष्णता वाढु लागल्याने झऱ्याचे पाणी आटण्यास प्रारंभ झाल्या असून, पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. कुसुंबीमुरा (ता.जावली) येथील आखाडेवाडीतील ग्रामस्थांना उन्हाचे चटके सोसत पायपीट करून डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी रात्र-रात्र जागून पाणी भरावे लागत आहे. रात्री उंच कडय़ाकपारीत झऱ्याचे पाणी मिळवण्याच्या कसरतीतून पाय घसरून विपरित घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. शेकडो जनावरांदेखील पाणीटंचाईच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.
पावसाचे आगार असणाऱ्या या डोंगरी भागात डोंगरउतारामुळे पावसाचे पाणी मोठया प्रमाणावर वाहुन जाते. परिसरातील कित्येक गावांमध्ये सध्या पाण्याची तीव्रटंचाई जाणवू लागली आहे. कुसुंबीमुरा येथील 24 कुंटुबे असणाऱ्या आखाडेवाडीतील 150- 200 लोकसंख्या असणाऱ्या ग्रामस्थांना आत्तापर्यंत टाकीतून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा होत होता. ज्या झऱ्यातून पाणी टाकीत सोडले जात होते, त्या झऱ्याचेच पाणी कमी होऊ लागल्याने मागील आठवडय़ात झऱ्यातून टाकीत आणण्याचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. सदयस्थितीला झऱ्याचे पाणी मोठय़ाप्रमाणावर कमी झाल्याने डोंगरातील झऱ्यावर दोनशे अडीचशे फूट खोल दरीत कडयालगत असणाऱ्या झऱ्यावर रात्रंदिवस पाणी भरण्यासाठी महिला, लहानगे, पुरुषमंडळी पायपीट करताना दिसत आहे.
ग्रामस्थ शेतीची कामे सोडून पाण्यासाठी भटकंती करत आहेत. दिवसभर लहानगे भांडी घेऊन झऱ्यावर तळ ठोकून आहेत. झरा लोकवस्तीपासुन काही अंतरावर असल्यामुळे आपल्या कुंटुबाची तहान भागविण्यासाठी महिलांना डोंगरातुन कडक उन्हात डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे. डोंगरउतारावर पावसाचे पाणी अडविण्यासाठी चरी काढल्याने उंच माथ्यावर आखाडेवाडी असल्याने त्याचा फायदा होणार नसल्याचे ग्रामस्थ सांगतात.
पावसाच्या आगरातच हंडाभर पाण्यासाठी नागरीकांची होणारी वणवण म्हणजे लोकप्रतिनिधी आणी प्रशासनाचे आपयशच म्हणावे लागेल. जिथं पाण्यासाठी एवढी धडपड करावी लागतेय तिथं शासकीय सुविधा किती पोहचल्या असतील, ही सांगण्यापलीकडचीच गोष्ट असून आता तरी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन वेळेत लक्ष घालून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवणार का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
मुबलक पाणी उपलब्ध होण्यासाठी झऱ्यांचा शोध घेऊन लोकसहभागातून बरेचसे प्रयत्न केले. उन्हाळय़ात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. गतवषीपेक्षा यंदा लवकर पाणीटंचाई भेडसावत असून प्रशासनाकडून विहीर, बोअर तसेच तात्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठा व्हावा.
-ज्ञानेश्वर आखाडे, ग्रामस्थ, आखाडेवस्ती (कुसुंबीमुरा)