नजिकचे लोक एकमेकांवर अवलंबून
अत्यावश्यक सेवेपासून शेतकरी वंचितच
वार्ताहर / दोडामार्ग:
गोवा राज्य कोरोनामुक्त झाल्याने परराज्यातील व्यक्तीला गोवा राज्यात प्रवेश देण्यास सक्त बंदी केली आहे. त्या धर्तीवर गोवा प्रशासनाने राज्याच्या सीमेवर कडक बंदोबस्त ठेवला. मात्र, याचा फटका सीमावर्ती गावातील शेतकऱयांना बसला आहे. गोवा व महाराष्ट्र सीमेवरील गावातील लोक एकमेकांवर अवलंबुन आहेत. राज्य सीमेला लागूनच शेती, दुग्ध व्यवसाय आहेत. मात्र, गोव्याच्या या निर्णयामुळे येथील लोकांत वादविवाद उद्भवू लागल्याने दोन्ही प्रशासनाने मिळून तोडगा काढावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी केली.
गोव्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी गोवा सरकारने आपल्या सर्व हद्दी सील करीत त्याठिकाणी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. मात्र, त्याचा फटका सीमावर्ती भागातील लोकांना बसला आहे. त्यात खास करून दोडामार्ग शहर व त्याला लागुनच असलेल्या साळ पुनर्वसन व खोलपेवाडी या भागातील लोकांमध्ये प्रवेश बंदीवरुन वाद होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. दोडामार्ग तालुक्यातील खोलपे गोवा येथे दूध घेऊन जाणाऱया शेतकऱयांचीही अडवणूक केली जाते. मात्र, त्याच खोलपेवाडी व साळ पुनर्वसन येथील लोक बाजारहाटासाठी दोडामार्ग शहरात येतात. ही बाब शहरवासीयांनी नगरपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, तरी देखील त्याकडे प्रशासनाकडून कानाडोळा करण्यात आल्याने शहरवासीयांनी सोमवारी नगरपंचायत कार्यालयावर धडक देत प्रशासनास जाब विचारला. यावेळी माजी नगराध्यक्ष संतोष नानचे व नगरसेवक राजेश प्रसादी हे उपस्थित होते. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी शिवराज गायकवाड यांच्याशी यावेळी चर्चा करण्यात आली. गायकवाड यांनी यावेळी आपण सायंकाळी होणऱया बैठकीत हा प्रश्न मांडून तहसीलदारांचे लक्ष वेधून व प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे सांगितले.