प्रतिनिधी/ दापोली
नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रीवादळात हर्णे गावचेही मोठे नुकसान झाले आहे. मात्र याचे पंचनामे करताना मोठा घोळ व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी हर्णे येथे तहसीलदार समीर घारे यांच्यासमोरच हंगामा केला. अखेर दोन तासांच्या प्रयत्नांनी तहसीलदारांनी तत्काळ फेरपंचनामे करण्याचे व यातील दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यानंतर हंगामा संपुष्टात आला.
हर्णे गावात 21 दिवस झाले तरी अद्याप वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही. शिवाय या चक्रीवादळात नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे सदोष असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. हे पंचनामे झाल्यानंतर याची यादी ग्रामपंचायत कार्यालय व रेशन दुकानात लोकांच्या पाहणीसाठी ठेवण्यात आली असता हा प्रकार उघड झाला. त्यानंतर ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. यानंतर तहसीलदार समीर घारे व उपविभागीय अधिकारी शरद पवार यांनी या सर्व प्रकरणाचे फेरपंचनामे होतील अशी ग्वाही ग्रामस्थांना दिली होती. त्यामुळे केंद्रिय पाहणी पथकासमोर होणारी निदर्शने ग्रामस्थांनी स्थगित केली होती. मात्र सोमवारपर्यंत यातील किती घरांचे पंचनामे झाले याबाबत ग्रामस्थांना ठोस माहिती न मिळाल्याने ग्रामस्थांनी सोमवारी ग्रामपंचायतीवर पुन्हा मोर्चा काढला. यानंतर सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील काही ग्रामस्थांनी तहसीलदार घारे यांची दापोलीत येऊन भेट घेतली. यावेळी ग्रामपंचायतीने लेटरहेडवर सदर पंचनामे सदोष झालेले असल्याचे पत्र तहसीलदारांना दिले.
तहसीलदारांचे गावभेटीचे आश्वासन
दरम्यान, तहसीलदार घारे यांनी आपण मंगळवारी सकाळी नऊ वाजता ग्रामपंचायतीमध्ये येऊन सर्व ग्रामस्थांचे प्रश्न ऐकून घेण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. त्यानुसार ग्रामपंचायतीने सर्व वाडय़ांच्या अध्यक्षांना रातोरात पत्र पाठवून सकाळी नऊ वाजता तहसीलदार घारे हर्णे येथे येणार असल्याचे कळवले. त्यानंतर सकाळी 9 वाजता येणारे तहसीलदार सव्वाअकरा वाजले तरी आले नाहीत. यामुळे ग्रामस्थांचा अचानक उद्रेक झाला. यावेळी सभापती रऊफ हजवानी, सरपंच मुनिरा शिरगावकर यांनी ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यानंतर अखेर तहसीलदार घारे साडेअकरा वाजता हर्णेत दाखल झाले. यावेळी मळेकर सभागृहात ग्रामस्थांसमवेत त्यांनी सभा घेतली.
सभेच्या सुरुवातीपासून ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा
ग्रामस्थांनी बैठकीच्या सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत तहसीलदार व प्रशासनाला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. या चक्रीवादळात नेमके किती पंचनामे झाले? ते पंचनामे कुणी केले? यात कुणाकुणाचे अंशतः नुकसान झाले आहे? कुणाचे पूर्णतः नुकसान झालेले आहे? अंशतः व पूर्णत: नुकसानीचे निकष काय? असा प्रश्नांचा भडीमार ग्रामस्थांनी तहसीलदारांवर केला. तहसीलदार व संबंधित अधिकाऱयांनी सर्व ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यावेळी सभापती हजवानी यांनी लोकांना शांत राहण्याच्या सूचना केल्या. मात्र गदारोळ वाढतच होता.
मुस्लिम महिलांची कैफियत
यावेळी मुस्लिम महिलांनीदेखील तहसीलदारांसमोर आपल्या घरी अद्याप कोणीही सरकारी अधिकारी नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेला नसल्याचे सांगितले. यावर तहसीलदारांनी आपण तत्काळ पूर्ण नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करत असून अंशतः नुकसान झालेल्यांना अंशतः व पूर्ण नुकसान झालेल्यांना पूर्ण घराची नुकसान भरपाई तत्काळ देण्यात येईल असे आश्वासन दिले.
यानंतर तहसीलदार घारे यांनी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामपंचायतीचे अधिकारी व पुन्हा पंचनाम्याला आलेल्या अधिकाऱयांच्या पथकाबरोबर बैठक घेतली व तत्काळ पुन्हा पंचनाम्याच्या कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिले.
टीमने केला घोटाळा
रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण येथून ग्रामसेवक व तलाठय़ांच्या 21जणांच्या टीमला हर्णे येथे पंचनामे करण्यासाठी पाचारण केले होते. मात्र या टीमने हॉटेलमध्ये व वाडीतील एकाच घरात बसून पंचनामे केले. ही टीम कोणत्याही घराची पाहणी करण्यासाठी गेलेली नाही. शिवाय अंशतः नुकसान झालेल्या घरांचे पूर्णतः नुकसान दाखवण्यासाठी मोठय़ाप्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी तहसीलदारांसमोर केला. तसेच ग्रामपंचायतीच्या तेरा सदस्यांपैकी चार सदस्यांच्या घरांचे अंशत: नुकसान झालेले असूनही त्यांच्या घरांचे पूर्णतः नुकसान झालेले असल्याचे खोटे दाखवण्यात आले व त्यांनीदेखील शासनाचे दीड लाख रुपये लाटल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. तसेच या टीमने केलेल्या हर्णे गावातील सोळाशे पंचनाम्यांपैकी एकाही पंचनाम्यावर सही केलेली नाही. सही करण्यास त्यांनी नकार दिल्याचे एका अधिकाऱयाने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले. यामुळे अखेर नाईलाजास्तव तलाठय़ांना सर्व पंचनाम्यांवर सह्या कराव्या लागल्या.
महिला कर्मचाऱयावर धमकीचा आरोप
यावेळी एका ग्रामस्थाने येथील महिला कर्मचाऱयावर धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला. शिवाय आपण याबाबत तहसीलदारांकडे लेखी तक्रार केलेली असल्याने त्यांनी ही तक्रार सभागृहाला वाचून दाखवावी असा आग्रह धरला. मात्र तक्रार ही एका महिलेच्या विरोधात असल्याने ती तक्रार आपण सार्वजनिकरित्या वाचू शकत नाही असे तहसीलदारांनी स्पष्ट केले.
दोषींवर कडक कारवाई करणार
हर्णे येथील नुकसानीचे पुन्हा पंचनामे करण्याचे आदेश आपण दिलेले आहेत. हे पंचनामे पूर्ण झाले की यात कोण दोषी आहे व कोण नाही हे समोर येणार आहे. यात जर प्रशासनातील कोणी व्यक्ती दोषी आढळला व ज्यांनी प्रशासनाला खोटी माहिती घेऊन पैसे लाटण्याचा प्रयत्न केला असेल त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे तहसीलदार घारे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.