वार्ताहर/ मौजे दापोली
दापोली तालुक्यातील वादळी परिस्थितीमुळे पुन्हा समुद्रकिनाऱयावर आलेल्या नौका, डिंग्या आता सावधपणे मासेमारीसाठी समुद्रात उतरवल्या जात आहेत.
पापलेट, म्हाकुळ, सुरमई, कोळंबी अशा अधिक किंमतीची मासळी मिळत असताना दापोली किनारपट्टीवर पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. 6 सप्टेंबरला अचानक रात्री वादळ व विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. 7 तारखेला हवामान खात्याने मासेमारीसाठी न जाण्याचे आदेश दिले होते.
हर्णे बंदरातील मच्छीमार उत्तरेकडील बाजूस मासेमारीसाठी गेले असता वादळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने सुमारे 100 नौका जवळच्या खाडीत घुसल्या, तर दक्षिणेकडे गेलेल्या 80 नौकांनी जयगड खाडीत आश्रय घेतला. काही नौकांना आंजर्ले खाडीत नेण्यात आले, तर काही नौका हर्णे किनाऱयावर उभ्या होत्या. हर्णेतून नौका आणि डिंग्या इतर खाडीत आश्रयास गेल्याने हर्णे किनारपट्टीवर किरकोळ होडय़ा दिसत आहेत.
हवामानाचा अंदाज घेऊन काही मच्छीमारांनी आपल्या होडय़ा समुद्रात घातल्याने अनेक दिवस बंद असलेली मासेमारी पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. काही होडी मालक वादळ, पाऊस झाल्यास लगेच †िकनाऱयाकडे धाव घेता यावी यासाठी किनाऱयालगत मासेमारी करत आहेत.
दापोली तालुक्यात हर्णे, दाभोळ, बुरोंडी, केळशी ही मासेमारीची मोठी केंद्र आहेत येथे दररोज कोटय़वधी रुपयांची मासेमारी होते हे मासे शासनाला परकीय चलन मिळवून देतात हजारो कुटुंबांचे पोट भरते.या मासेमारीवर अनेक जोडधंदे देखील चालतात. मात्र लॉकडाऊन व खराब हवामानाचा जबर फटका या व्यवसायाला बसत आहे. शिवाय हवामान खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष व हवामानाचा अंदाज वेळेत कोळी बांधवांचा पर्यंत पोहोचण्यात दिरंगाईचा फटकाही कोळी बांधवांना बसत आहे याबद्दल दापोली किनारपट्टीवरील सर्व बंदरांवर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. हवामानाचा अंदाज वेळेत मिळत नसेल तर हवामान खाते हवे कशाला असा प्रश्न त्रस्त माच्छीमार बांधव विचारत आहेत.