खानापूर तालुका हिंदू जनजागृती समितीची मागणी : उपतहसीलदारांना निवेदन
प्रतिनिधी /खानापूर
शिमोगा येथे काही जातीयवादी संघटनाकडून बजरंग दल कार्यकर्ता हर्ष याच्या झालेल्या हत्येचे प्रकरण अत्यंत गंभीर असून ते प्रकरण चौकशीसाठी एनआयएकडे सोपवावे, या प्रकरणात दहशतवादी संघटनेचा हात असल्याने त्याचीही अत्यंत गांभीर्याने चौकशी करावी आणि संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन खानापूर तालुका हिंदू जनजागृती समितीच्या वतीने शुक्रवारी खानापूरचे उपतहसीलदार के. आर. कोलकार यांना देण्यात आले. उपतहसीलदारानी निवेदनाचा स्वीकार करून ते राज्य सरकारकडे पाठवून देण्याचे आश्वासन दिले.
या निवेदनात असे म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यात जातीयवादी संघटनाकडून जवळपास 30 ते 35 हिंदू कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे. त्यातच आता शिमोगा येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्ष यांची हत्या करून जातीयवादी संघटनानी कहर केला आहे. अशा संघटनावर बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली, पण या मागणीकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे.
राज्य शासनाने हर्ष हत्या प्रकरण अत्यंत गांभीर्याने घ्यावे व त्याची अधिक चौकशी करण्याची जबाबदारी एनआयएकडे सोपवावी. तसेच अशा जातीयवादी संघटनांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा, अशी निवेदनात मागणी करण्यात आली आहे.
सदर निवेदन देताना संभाजी चव्हाण, दीपक पाटील, गोविंदराव किरमटे, गंगाराम कुम्रतवाडकर, मोहन हुंदरे, सोनाप्पा झुंजवाडकर, विद्यानंद नार्वेकर, बाळाराम सावंत, रमेश शिंगनाथ यासह हिंदू संघटनांचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.