प्रतिनिधी/ निपाणी
लॉकडाऊन शिथिल करताना केंद्र सरकारने विमानसेवेला परवानगी दिली. त्यानुसार कर्नाटकात देशाच्या विविध राज्यातून विमानाद्वारे प्रवासी येत आहेत. असे असताना रस्त्याने येणाऱया सामान्य कुटुंबातील नागरिक, मजूर, प्रवाशांना मात्र राज्य सरकारने प्रवेशबंदी केली आहे. हवाई प्रवाशांना पायघडय़ा अन् रस्त्याने येणारे मात्र वाऱयावरच अशा प्रकारच्या दुटप्पी धोरणामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
तिसऱया टप्प्यात लॉकडाऊनचे निर्बंध काहीसे शिथिल करत केंद्र सरकारने 4 मे पासून देशात विविध ठिकाणी अडकलेल्या प्रवासी तसेच मजुरांना घरी परतण्याची मुभा दिली. मात्र तेव्हा सार्वजनिक वाहतूक सेवा बंद असल्याने अनेक मजुरांना शेकडो मैलांची पायपीट करत घरी जावे लागले. अजूनही अनेक जण जात आहेत. रस्त्याने चालत जाताना उष्णतेचा मारा व उपाशी पोट यामुळे काहींनी वाटेतच प्राण सोडला.
कर्नाटकात विविध राज्यातून येणाऱया प्रवाशांना सेवासिंधू या राज्य सरकारच्या वेबसाईटवरुन परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले. परवानगी नसल्यास कोणत्याही व्यक्तीला प्रवेश मिळणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली. सरकारच्या या वेबसाईटद्वारे हजारो प्रवाशांनी परवानगी मिळवत राज्यात प्रवेश केला. मात्र राज्याबाहेरुन आलेल्या प्रवाशांमुळे कोरोनाचा संसर्ग अधिकच वाढल्याचे दिसून येताच 18 मे पासून राज्य सरकारने महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, दिल्ली, राजस्थान आदी राज्यातून येणाऱया प्रवाशांना पूर्णपणे प्रवेशबंदी करत सेवासिंधूअंतर्गत परवानगी देण्याची प्रक्रिया थांबवली.
यानंतर विविध राज्यातून परवानगी मिळवत कर्नाटकाच्या सीमेपर्यंत आलेल्या शेकडो मजूर, प्रवाशांना सीमेवरच रोखण्यात आले. परवानगी नसल्याचे कारण पुढे करत त्यांना कर्नाटकात घेण्यास नकार देण्यात आला. विनवण्या करूनही प्रवेश न मिळाल्याने या मजूर प्रवाशांना पाणावलेल्या डोळय़ांनी माघारी जावे लागले. यामध्ये लहान मुले, महिला यांचे होणारे अतोनात हाल दिसूनही कोणतीच पावले उचलण्यात आली नाहीत.
एकीकडे अशी भयानक स्थिती असताना दुसरीकडे केंद्र सरकारच्या परवानगीनंतर कर्नाटकात विमानसेवा सुरू झाली आहे. त्यानुसार बेळगावात बेंगळूर, अहमदाबाद, हैदराबाद यासह देशातील विविध ठिकाणाहून विमानाद्वारे प्रवासी दाखल झाले. या प्रवाशांची विमानतळावर आवश्यक आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांना क्वारंटाईन तसेच होमक्वारंटाईन करण्यात येत आहे. मात्र विमान प्रवाशांना जशी तत्परता दाखवली जात आहे तशी तत्परता रस्त्याने चालत अथवा वाहनाद्वारे येणाऱया प्रवाशांना का दाखवली जात नाही? असा संतापजनक सवाल उपस्थित होत आहे.