जिल्हय़ातील आंबा बागायतदार चिंतातूर
प्रतिनिधी/ रत्नागिरी
अवकाळी पावसाने जिल्हय़ातील आंबा बागायतदारांचे पुरते कंबरडे मोडले आहे. या हंगामात थंडीचा थांगपत्ता नाही. गेल्या 15 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे तुडतुडय़ाचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव वाढणार आहे. केवळ 5 टक्केच झाडांना मोहोर आला आहे. अशा निसर्ग संकटात सोमवारी रत्नागिरीसह अनेक भागात बरसलेल्या पावसाने ‘हापूस’ मोठय़ा संकटात सापडला आहे. त्यामुळे येथील आंबा बागायतदार पुरते चिंताग्रस्त बनले आहेत.
बदलत्या निसर्ग चक्राचा परिणाम फळपिकांवर होऊ लागला आहे. आवशय्क असलेल्या पोषक वातावरणा अभावी येथील आंबा, काजू व इतर पिकेही धोक्यात आलेली आहेत. आंबा पिकावर यावर्षी हंगाम सुरू होण्याच्या प्रारंभापासून नैसर्गिक संकटाने घेरलेले आहे. दिवळीपासून थंडीला प्रारंभ होऊन या पिकाच्या मोहोर, फळधारणेसाठी पोषक वातावरण तयार होते. नोव्हेंबरपासून आंब्यावर किडरोगांचा प्रार्दूभाव नियंत्रणासाठी औषध फवारण्यांना प्रारंभ होत असतो.
पाण यावर्षीचा आंबा हंगामाची सुरूवातच संकटात आहे. थंडीला प्रारंभ झाला. पण सलग आठवडाभर थंडीचा प्रभाव न राहता वातावरणात सतत बदल झाला आहे. गेल्या 15 दिवसांपासून तर थंडी गायब आणि ढगाळ वातावरण तयार झालेले आहे. त्यामुळे या पिकावरील संकटात अधिक वाढ झालेली आहे. गेल्या हंगामात उशिरापर्यंत पडलेल्या पावसाने आंबा झाडांना मोठय़ा प्रमाणात पालवी आलेली आहे. त्याचा परिणाम उशिरा मोहोर येण्यावर झालेला आहे. ही पालवी टिकवण्यासाठी बागायतदारांकडून प्रयत्न होत आहेत.
त्यात बदलत्या वातावरणाने आंबा पालवीवर थ्रीप्स, तुडतुडय़ा रोगांचा मोठय़ा प्रमाणात प्रार्दुभाव झालेला दिसून येत आहे. हा रोग आटोक्यात आणण्यासाठी फवारण्यांवर फवारण्या मारव्या लागत आहेत. थंडी नसल्याने मोहोर येण्याची प्रक्रिया देखील या हंगामात थांबलेली आहे. केवळ 5 टक्के आंबा कलमांना मोहोर आल्याचे चित्र दिसत असल्याचे बागायतदारांकडून सांगण्यात येते. जरी वातावरण आता पोषक नसले तरी काही झाडांना मोहोर येण्यासाठी फुटवे डोकावू लागले आहेत.
अशावेळी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे हवामान खात्याने या भागात पावसाची शक्यता वर्तवली होती. जिह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान होते. रविवारी दुपारपासूनच अनेक भागात पावसाची रिमझिम झाली. सोमवारी तर अवकाळी पावसाची चांगलीच गडद छाया रत्नागिरीत पसरलेली होती. सकाळी 9 वाजल्यापासून अनेक भागात रिमझिम सुरू झाली. पण त्यानंतर ढगांच्या गडगडाटासह चांगलाच पाऊस बरसला.
या अवकाळी पावसामुळे बागायतदारांनी डोक्याला हात टेकले आहेत. किटकनाशके फवारणीच्या कामांत व्यस्त असलेला बागायतदार चिंतातूर झाला आहे. रत्नागिरी जिह्याच्या सर्वच भागात अवकाळी पाऊस आला. अनेक भागात रिमझीम पावसाची हजेरी झाली आहे. एवढा पाऊस बरसल्याचा परिणाम मोहोरावर बुरशी हे पिक नष्ट होण्याचा धोका वाढला आहे. पावसाचा आंबा पिकावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
सर्वे करून शासनास अहवाल सादर करा-टि.एस घवाळी, बागायतदार
आंबा बागायतदारांनी निसर्गाच्या या दृष्टचक्रासमोर हात टेकले आहेत. सततच्या बदलणाऱया या वातावरणाने आंबा पिक वाचवायचे तरी कसे? असा प्रश्न सर्व बागायतदारांसमोर उभा आहे. यावर्षी हवामानाचे असलेले विदारक चित्र पाहता हापूस आंबा हाताशी किती लागेल याची शाश्वती देता येत नाही. आता तर अवकाळीने मोठी चिंता वाढली आहे. कलमे मोहोर येण्याच्या प्रतिक्षेत होती. पण त्यात आता अवकळी पाऊस बरसल्याने परत वातावरण गरमी वाढल्यास अधिक पालवी येण्याचा संभव आहे. त्यामुळे हापूस चे चक्र पुरते बदलून जाण्याचा धोका सतावतो आहे. त्यामुळे या झालेल्या नुकसानीचा शासनाने सर्वेक्षण करावे. त्याचा अहवाल शासनाला सादर करावा अशी मागणी येथील बागायतदारांच्यावतीने केली जात असल्याचे आंबा बागायतदार टि.एस.घवाळी यांनी केली आहे.
दापोली डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून जारी करण्यात आलेल्या प़ृषी पत्रिकेद्वारे देण्यात आला आहे. कपावसामुळे फळझाडांवर तुडतुडे, भुरी, करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. थंडीतदेखील सध्या घट रहाणार आहे. आद्रतेत वाढ आणि ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असल्याने मोहोर फुटलेल्या आंबा बागेमध्ये तुडतुडे, मिजमाशी या किडींचा तसेच भुरी व करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या रोगांच्या नियंत्रणासाठी मोहोर फुलण्यापूर्वी तुडतुडे आणि मिजमाशीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड 17.8 टक्के प्रवाही 3 मि. ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. या फवारणीमध्ये भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी 5 टक्के हेक्झोकोनॅझोल 5 मि. ली. किंवा पाण्यात विरघळणारे 80 टक्के गंधक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर आणि करपा रोगाच्या नियंत्रणासाठी संयुक्त बुरशीनाशक कार्बेन्डॅझिम 12 टक्के अधिक मन्कोझेब 63 टक्के, 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वापरावे. किडीच्या नियंत्रणसाठी डेल्टामेथ्रीन 2.8 टक्के प्रवाही 9 मि. ली. प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी आणि करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डॅझिम 12 टक्के अधिक मन्कोझेब 63 टक्के या संयुक्त बुरशीनाशकाची 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तसेच काजूवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असल्याने रोगाच्या नियंत्रणसाठी 0.2 टक्के मॅन्कोझेब 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच काजू मोहोराच्या ढेकण्या व फुलकिडीपासून संरक्षण करण्याकरिता मोहोर फुटण्याच्या वेळी फवारणी घेतली नसल्यास प्रोफेनोफॉस 50 टक्के प्रवाही 10 मि. ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असा सल्ला दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून जारी करण्यात आलेल्या प़ृषी पत्रिकेद्वारे देण्यात आला आहे.