जिल्हय़ात 4 हजार 566 उत्पादकांची नोंदणी
प्रतिनिधी / रत्नागिरी
हापूसच्या परदेश निर्यातीसाठी जिल्हय़ातील आंबा उत्पादक आता अधिक संख्येने पुढे येऊ लागले आहेत. निर्यातीतून आंब्याला अधिक दर मिळत असल्याने शासनाच्या मँगोनेट योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेकजण पुढे येत आहेत. जिल्हय़ातील 4 हजार 566 आंबा उत्पादक शेतकऱयांनी आतापर्यंत मँगोनेटमध्ये नोंदणी केली आहे. तसेच 3 हजार 399 आंबा उत्पादक शेतकऱयांनी आपल्या प्रमाणपत्राचे नूतनीकरण केले आहे.
मँगोनेट सुविधेला गतवर्षी चांगला प्रतिसाद मिळाला होता. हापूसला उत्तम दर मिळावा, यासाठी नाशिकमधील ग्रेप्सनेटच्या धर्तीवर हापूस आंब्याच्या निर्यातीसाठी ’मँगो नेट’चा पर्याय सहा वर्षापूर्वी निवडण्यात आला. नोंदणीदरम्यान बागायतदार कोणत्या देशात हापूसची निर्यात करण्यास इच्छुक आहे, त्याची माहिती ऑनलाईन नोंदवून त्या देशांच्या सूचनेनुसार दर्जेदार हापूसचे उत्पादन घेतले जाते. 2014-15 पासून मँगोनेट सुविधा सुरू करण्यात आली. नोंदणीकृत शेतकऱयांच्या प्रमाणपत्रांचे दरवर्षी नूतनीकरण करण्यात येते. नोंदणी सुविधा वर्षभर उपलब्ध असून जास्तीत जास्त शेतकऱयांनी नोंदणी करावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.